अनिश्चित काळासाठी सर्व सेवा राहणार बंद
बेळगाव / प्रतिनिधी
लॉकडाऊनच्या निर्णयानंतर बेळगावमधील रेल्वे, बस व खासगी वाहतूकीच्या सेवा बंद करण्यात आल्या. तरीही नागरिकांची प्रवासाची भिस्त ही विमानप्रवासावर होती. परंतु सुरक्षेच्या कारणास्तव मंगळवारपासून अनिश्चित काळासाठी बेळगावच्या सांबरा विमानतळ ‘शटडाऊन’ करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवासाचा शेवटचा पर्यायही बंद करण्यात आला आहे.
बेळगाव जिल्हा हा महाराष्ट्र व गोवा राज्यांच्या सीमेलगत आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका सर्वांधिक आहे. बेळगावमध्ये अजून कोरोनाग्रस्त सापडलेला नसला तरी खबरदारी घेतली जात आहे. यासाठी महाराष्ट्र व गोवा राज्यातून होणारी वाहतूक पूर्णपणे थांबविण्यात आली आहे. पहिला बस व नंतर रेल्वेही बंद करण्यात आल्याने केवळ विमान प्रवास हा एकमेव पर्यांय नागरिकांसमोर होता.
बेळगावमधून बेंगळूर, मुंबई, पुणे, हैदराबाद, तिरूपती, कडप्पा, म्हैसूर, अहमदाबाद, इंदूर, अजमेर या शहरांना विमानसेवा देण्यात येत होती. परंतु ही सेवाही मंगळवारपासून बंद करण्यात आली आहे. मुंबई, पुणे व बेंगळूर या शहरांमध्ये कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेवून बेळगाव विमानतळावरील सर्व सेवा अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे गजबजलेले बेळगाव विमानतळावर मंगळवारी शांतता पसरली होती.
बेळगाव विमानतळ प्राधिकरणाचे संचालक राजेशकुमार मौर्य यांनी ट्वीट करून विमानतळ शटडाऊन केले जात असल्याचे सांगितले. त्यामुळे काही प्रवाशांची गैरसोय झाली. सोमवारी रात्री उशिराने हा निर्णय घेण्यात आल्याने प्रवाशांचा त्याचा फटका बसला. दररोज 1300 ते 1400 प्रवासी प्रवास करणाऱया बेळगावच्या विमानतळावर मंगळवारी मात्र शुकशुकाट होता.









