प्रतिनिधी / बेळगाव
कन्नड-मराठी फलक प्रकरणांमुळे बेळगाव-कोल्हापूर बससेवेवर परिणाम झाला असून बेळगाव बसस्थानकातून धावणाऱया बसेस कोल्हापूर बसस्थानकात न जाता बाहेरूनच धावत आहेत. महाराष्ट्रातून बेळगावकडे धावणाऱया बसची संख्याही कमी झाली आहे. कोल्हापूर आगाराच्या बसेसही ठप्प झाल्या आहेत. परिणामी प्रवाशांची मात्र मोठी गैरसोय होत आहे.
आठ दिवसांपासून कर्नाटक-महाराष्ट्र बससेवा विस्कळीत झाली असून प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. बेळगाव बसस्थानकातून महाराष्ट्रात धावणाऱया 142 बससेवेवर परिणाम झाल्याने बेळगाव विभागाला दररोज 5 ते 6 लाखांचा फटका बसत आहे. कर्नाटक-महाराष्ट्र असा दैनंदिन प्रवास करणाऱया प्रवाशांची संख्या अधिक आहे. त्यामुळे कर्नाटकातील बेळगाव, निपाणी, संकेश्वर, चिकोडी, हुक्केरी आदी विभागांना चांगला महसूल मिळतो. मात्र, आठ दिवसांपासून कर्नाटक-महाराष्ट्र आंतरराज्य बससेवा विस्कळीत झाल्याने महसुलावर परिणाम झाला आहे. बेळगाव जिल्हय़ातील सर्व आगारांचा महसूल महाराष्ट्रात धावणाऱया बसेसवर अवलंबून आहे. कर्नाटक-महाराष्ट्र बससेवा विस्कळीत झाल्याने आगारांचे उत्पन्न खाली आले आहे.









