वार्ताहर / व्हनाळी
बेलवळे बुद्रुक ता. कागल येथील दुधगंगा नदीकाठ ते काळाबागदेव मंदिरापर्यंत सुमारे ५५ एकर क्षेत्रातील शेतकऱ्याच्या उसाला शॉर्टसर्किटने आग लागून सुमारे पाच लाखाचे नुकसान झाले आहे.
नदीकाठी असलेल्या दत्त मंदिराजवळ असलेल्या डीपीच्या शेजारी असलेल्या विद्युत पोलवरती तारांच्या शॉर्टसर्किटमुळे उसाच्या फडाला दुपारी साडेबाराचे दरम्यान आग लागली, आणि उन्हामुळे सुमारे ५०एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक झाला. बिद्रीच्या अग्निशामक पाण्याच्या बंबानाही आग विझवण्यास मर्यादा आल्या. पाण्याच्या बंबानी आग विझवण्याचा प्रयत्न केला, पण रस्त्यावर गाडी उभारून ऊसाला लागलेल्याआगीपर्यंत शेतातून जाता येत नसल्यामुळे ऊस जळून खाक झाला.
आपतग्रस्त शेतकऱ्यांची नावे,कृष्णा ज्ञानू काशिद,आनंदा सावेकर,आनंदा कदम,प्रकाश नंदगावे, बाळू कदम,राजेंद्र हिंदूराव पाटील,बाबुराव पाटील,आदी सुमारे चाळीस भर शेतकऱ्यांचा ऊस जळाला. सदर नुकसान विद्युत मंडळाच्या गलथान कारभारामुळे झाल्याने नुकसानग्रस्त शेतक-यांना भरपाई मिळावी व शाहू हमीदवाडा,बिद्री,संताजी घोरपडे,अन्नपुर्णा शुगरचे जळलेल्या ऊसाची लवकर उचल करावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.









