प्रतिनिधी / रत्नागिरी :
येथील मध्यवर्ती बसस्थानकाचे काम अतिशय संथ गतीने चालू आहे. ते लवकर पूर्ण करण्यासाठी कालबध्द नियोजन आवश्यक आहे. मात्र एकंदरीत कामावरून काहीच नियोजन केल्याचे दिसून येत नाही. यापुढे असेच संथगतीने काम झाल्यास संबंधित ठेकदारावर कारवाई करण्यात यावी अशा सूचना उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी प्रशासनाला केल्या आहेत.
रविवारी तंत्र शिक्षण मंत्री सामंत रत्नागिरी दौऱयावर असताना त्यांनी रत्नागिरी एस्टी बसस्थानक बांधकामाच्या कामाची पहाणी केली. यावेळी सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण एस्टी. महामंडळाच्या कार्यकारी अभियंता विद्या भिलारकर उपस्थित होत्या.
बसस्थानकाच्या कामास विविध कारणांनी आजवर विलंब झाला आहे. यापुढील काळात तसे होणार नाही याची खबरदारी घ्या, कामावर नियमित लक्ष ठेवण्यासाठी एका सल्लागाराची नियुक्ती करण्याची सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना उदय सामंत यांनी यावेळी केली.
बस स्थानकाच्या कामामुळे नागरिक आणि प्रवासी यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. प्रवासी स्थानकासमोर मुख्य मार्गावर उभे असतात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. यासाठी लगेच दुसऱया ठिकाणावरुन बस सुटतील याची व्यवस्था करा त्यासाठी लागणाऱया सर्व परवानग्या त्वरित देण्यात येतील, असेही सामंत म्हणाले. बसस्थानकासमोर रस्त्यावर होणारी गर्दी कमी होण्यासाठी लवकरच नियोजन करणार असल्याचे एस्टीच्या अधिकाऱयांनी सांगितले.
जिल्हाधिकाऱयांकडून आढावा-
या कामाला गती देण्यासाठी सर्व संबंधित अधिकाऱयांची बैठक घेऊन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी लगेच कार्यालयात बैठक घेतली व विविध विभागांना सूचना दिल्या. या बैठकीस कार्यकारी अभियंता विद्या भिलारकर, तहसीलदार शशिकांत जाधव, नगर परिषद मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे, आगार व्यवस्थापक अजय मोरे आदींची उपस्थिती होती.









