कोलकाता / वृत्तसंस्था
दिल्लीत कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणाऱया शेतकरी नेत्यांनी शुक्रवारी पश्चिम बंगालमध्ये भाजपविरोधात प्रचार करण्यास सुरुवात केली. प्रचारापूर्वी पत्रकार परिषद घेत पत्रकार परिषद घेत ‘आम्ही कोणत्याच पक्षाचे समर्थन करत नाही.’ असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच ‘जर बंगाल निवडणुकीत भाजपचा पराभव झाला तर त्यांचा अहंकार मोडेल आणि मगच ते शेतकऱयांचे म्हणणे ऐकून घेतील’ असा युक्तिवादही केला.
गेल्या शंभर दिवसांहून अधिक दिवस दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱया शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी आता पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रवेश केला आहे. विशेषतः पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुका डोळय़ासमोर ठेवून ‘नो वोट टू बीजेपी’ अंतर्गत अभियान सुरू केले आहे. इतके दिवस हे शेतकरी नेते नवीन कृषी कायदे रद्द करण्यासाठी आणि शेतमालाला हमीभाव मिळावा यासाठी कायदा करावा, या मागणीसाठी मागील वर्षाच्या नोव्हेंबर महिन्यापासून दिल्लीतील सिंघू, टिकरी आणि गाझीपूर सीमेवर आंदोलन करीत होते.
शेतकरी नेते आता पश्चिम बंगाल, आसाम व केरळमध्ये जाऊन भाजपला मते देऊ नका, असे जाहीर आवाहन करणार आहेत. दरम्यान, दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला 4 महिने पूर्ण होत असल्यानिमित्त 26 मार्चला संयुक्त किसान सभेने ‘भारत बंद’ची हाक दिली आहे.









