वारंवार तक्रारी करूनही अधिकाऱयांचा बेजबाबदारपणा : तातडीने खड्डे बुजविण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
मुख्य पोस्ट कार्यालयासमोरील पोस्टमन चौकाला दुरवस्थेचे ग्रहण लागलेल्या खड्डय़ांकडे कॅन्टोन्मेंट प्रशासनाने कानाडोळा केला आहे. यामुळे या ठिकाणी खचलेला रस्ता आणि निर्माण झालेले मोठेमोठे खड्डे वाहनधारकांना धोकादायक बनले आहेत. पावसाचे पाणी खड्डय़ांमध्ये साचत असल्याने यामधून ये-जा करताना वाहनधारकांना कसरत करावी लागत असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
‘पोस्टमन चौक’ असे नामकरण करून या ठिकाणी पोस्टमनचा पुतळा उभारण्यात आला. मुख्य पोस्ट कार्यालयासमोर असलेल्या खुल्या जागेत उद्यान निर्मितीचा प्रस्तावदेखील तयार करण्यात आला आहे. मात्र या चौकातील रस्ता पावसामुळे खचला आहे. या ठिकाणी संपूर्ण चौकात खड्डय़ांचे साम्राज्य निर्माण झाले असून वाहनधारकांना ये-जा करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
पाटील गल्लीतील नाल्याजवळ मोठा खड्डा निर्माण झाला असून शहरात येणाऱया नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. खड्डय़ांचा आकार मोठा झाल्याने नागरिकांनी त्यामध्ये दगड घातले आहेत. वाहनधारक खड्डा चुकविण्याचा प्रयत्न करीत असल्याने अपघात घडत आहेत. या ठिकाणी पाटील गल्ली, मुजावर गल्ली आणि शिवाजी रोड असे तीन रस्ते मिळत असल्याने वाहनांची गर्दी नेहमीच असते. रेल्वेस्टेशन रोड, खानापूर रोड व इस्लामिया शाळेकडे जाणारे रस्ते असल्याने हा चौक नेहमी गजबजलेला असतो. त्यामुळे तातडीने खड्डे बुजविण्याची मागणी होत आहे.
कॅन्टोन्मेंट प्रशासनाचे दुर्लक्ष
या ठिकाणी पोस्ट कार्यालय असल्याने वृद्ध नागरिकांचीही ये-जा असते. पण या ठिकाणी निर्माण झालेली परिस्थिती पाहता वाहनधारकांना धोकादायक बनले आहे. पुतळय़ाच्या परिसरात रस्ता खराब झाला असून, वाहनधारकांना गैरसोयीचे झाले आहे. सेंट मेरी शाळेकडून चौकाला जोडणाऱया रस्त्याच्या कॉर्नरवर गटार उघडय़ावरच ठेवण्यात आली आहे. यामुळे येणाऱया वाहनधारकांना खड्डय़ाचा अंदाज येत नाही. रात्रीच्या वेळी काही वाहनधारक या खड्डय़ामध्ये अडकून पडत आहेत. या चौकात अडचणी निर्माण होऊनदेखील कॅन्टोन्मेंट प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. या ठिकाणी अनर्थ घडण्याच्या प्रतीक्षेत कॅन्टोन्मेंटचे अधिकारी आहेत का, अशी विचारणा नागरिक करीत आहेत.









