पेठ वडगाव / प्रतिनिधी
केंद्र सरकारने ५ जून रोजी जारी केलेले तिन्ही शेतकरी अध्यादेश आणि लोकसभेत पास केलेल्या विधेयकांना कडाडून विरोध करण्याचा निर्धार देशातील सर्व शेतकरी संघटनांनी केला आहे. याचाच एक भाग म्हणून कोल्हापूरमध्ये सर्व संघटना पक्ष कृती समितीच्या वतीने २५ सप्टेंबर रोजी संसदेत पास केलेल्या शेतकरीविरोधी कायद्यांची वडगाव नगरपालिका चौकात होळी करण्यात आली.
यावेळी शेतकरी विरोधी मोदी सरकारचा धिक्कार असो, शेतकऱ्यांना भांडवलदारांच्या ताब्यात देणाऱ्या केंद्र सरकारचा धिक्कार असो, शेती आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाची, भांडवलदार धार्जिणे शेती विधेयके हाणून पाडा शेतमालाला आम्ही भाव मिळालाच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
यावेळी बोलताना हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू बाबा आवळे म्हणाले, चहा विकणाऱ्या या व्यक्तीने पंतप्रधान झाल्यानंतर देश विकायला काढला आहे.तिन्ही शेती विधेयकामुळे पिकांची सरकारी खरेदी पूर्णपणे थांबेल आणि खासगी बाजार स्थापन होऊन शेतकऱ्यांना मिळणारा हमीभाव बंद होईल. तसेच सर्व धान्य, डाळी, तेलबिया, कांदा आणि बटाटा या वस्तू अत्यावश्यक वस्तूंच्या यादीतून काढल्या जातील.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सह सेक्रेटरी गिरीश फोंडे म्हणाले, शेतकऱ्यांना किमान हमीभाव मिळत राहील हे भाजपचे अध्यक्ष श्री. नड्डा यांचे आश्वासन धादांत खोटे आहे. कारण केवळ ६ टक्के शेतकरीच या हमीभावाचा लाभ घेतात. त्यामुळे हमीभाव देण्याची काही गरज नाही, एफसीआय आणि नाफेड खरेदी देखील थांबवावी, तसेच सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत होणारा अन्नधान्याचा पुरवठाही थांबवावा, असे खुद्द भाजप सरकारने नियुक्त केलेल्या शांता कुमार समितीनेच जाहीर केले आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वैभव कांबळे म्हणाले, मोदी सरकार हमीभाव व स्वामीनाथन आयोग बद्दल बोलत नाही. जगभरातील सर्व देशांमध्ये शेतकर्यांच्या उत्पादनाला हमीभाव हा नेहमीच कंपन्यांकडून नव्हे तर सरकारकडून दिला जातो. एकही देश याला अपवाद नाही. कंपन्या तर केवळ स्वस्त दरात शेतीमाल खरेदी करून चढ्या दराने विकण्याचे आणि नफा कमावण्याचे काम करतात. एकदा पीक तयार झाले की त्याची विक्री करावीच लागते, अन्यथा ते नष्ट होते. यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष भगवान जाधव यांनी आपल्या भाषणात मोदी सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणावर कडाडून टीका केली. यावेळी कॉंग्रेसचे हातकणंगले तालुकाध्यक्ष भगवान जाधव, यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









