एकात्मिक प्रयोग जिल्हय़ात चर्चेचा विषय
विशेष प्रतिनिधी/ देवरुख
कोकणच्या लाल मातीत केवळ सुपारी, नारळ व भाताचेच उत्पादन घेतले जाते, हा समज शेतीमध्ये सुरु असलेल्या नवनवीन प्रयोगांनी चुकीचा असल्याचे दाखवून दिला आहे. सहा एकर क्षेत्रात केळीची लागवड करत तब्बल 60 ते 65 टनाचे उत्पादनही घेतले आहे. केवळ प्रयोग करून कोकणातील शेतकरी आता थांबत नसून त्यातून लाखो रूपयांची कमाई आणि लाखोंची उलाढालही करतोय. विशेष बाब म्हणजे संगमेश्वर तालुक्यात पुरूष शेतकऱयांनी बचत गटाच्या माध्यमातून ही किमया साधली आहे. शेतकऱयांनी केलेला एकात्मिक शेतीचा हा प्रयोग रत्नागिरी जिह्यात चर्चेचा विषय ठरला आहे.
संगमेश्वर तालुक्यातील धामणी गावच्या 21 पुरूषांनी एकत्र येत बचत गटाच्या माध्यमातून ही किमया साधलीय. जमीन व पैशाच्या समस्येवर चर्चा करत या शेतकऱयांनी तोडगा काढला आणि त्यातूनच 6 एकरावर जवळपास 5 प्रकारची पिकं घेत त्यातून आर्थिक उन्नतीचा मार्ग साधला. त्यामुळे सध्या लाखोंची कमाई व लाखोंची उलाढालही शेतीतून करता येऊ शकते, याचं उत्तम उदाहरण या शेतकऱयांनी सर्वांसमोर उभं केलंय.
सरकारी मदतीची कोणतीही अपेक्षा न ठेवता 2015 साली स्थापन झालेला हा पुरूषांचा बचत गट आता वर्षाला 60 ते 65 टन केळींचं उत्पादन घेतोय. महत्वाची बाब म्हणजे या केळ्य़ांना जिह्यातील बाजारपेठेतच पाठवलं जातं. केवळ एका पिकावर अवलंबून न राहता या शेतकऱयांनी भात, कलिंगड, दूध व गांडुळ खत निर्मितीही केलीय. महत्वाची बाब म्हणजे वर्षाला जवळपास लाखभर रूपयांच्या भाताची विक्री हे शेतकरी करतात. गिर गायींपासून दूध, शेण आणि गोमुत्रापासून जीवांमृत आणि गांडुळ खताची निर्मिती केली जाते. सेंद्रीय पद्धतीनं केल्या जाणाऱया या शेतातील उत्पादनांना बाजारात मागणीही चांगली आहे.
हे सारे यशस्वी प्रयोग पाहिल्यानंतर आता अन्य भागातील शेतकरीही एकात्मिक शेतीचा मार्ग अवलंबताना दिसत आहेत. यातील महत्वाची बाब म्हणजे कोकणच्या लाल मातीतही भात किंवा पारंपरिक पिकांशिवाय इतरही पिकं घेत त्यातून चांगलं अर्थाजन होऊ शकतं, याचं उत्तम उदाहरण या शेतकऱयांनी सर्वांसमोर उभं केलंय. संगमेश्वर तालुक्यातील धामणी येथील पुरुष बचत गटाने 6 एकरातील ही केळीची बाग स्वच्छ ठेवण्यावर सर्वाधिक भर दिला आहे. सुकलेली पाने बाजूला करणे, केळीची सुकलेली सोपं काढून टाकणे तसेच झाडांना सेंद्रीय खतांचीच मात्रा देणे यावर सर्वाधिक भर दिला आहे. केळीची ही स्वच्छ सुंदर आणि निटनेटकी लागवड पाहून कृषी अधिकाऱयांनीही धामणी पुरुष बचत गटाचे कौतुक केले आहे.
यशस्वी प्रयोग पाहण्यासाठी बचत गटांच्या भेटी
पुण्याच्या बन्सुरी फाऊंडेशन या संस्थेकडून त्यांच्या सीएआर फंडातून 1 टक्का व्याजानं कर्ज घेतलं आणि ते शेतकऱयांनी अल्पावधीत फेडलंही. शेतकऱयांची मेहनत, जिद्द आणि चिकाटी यामुळे हे शक्य आहे. धामणी येथील पुरुष बचत गटाच्या केळी लागवडीचा हा यशस्वी प्रयोग पाहण्यासाठी जिह्यातील विविध बचत गट भेट देत असतात. त्यांना सर्व प्रकारची माहिती येथे दिली जात आहे.-अमोल लोध (मार्गदर्शक)









