नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करावी, या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. बुधवारी येथे पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. गेल्या सोमवारी या प्रदेशातील काँगेस सरकारला बहुमत गमावल्याने सत्ता सोडावी लागली होती.
काँगेसचे नेते व्ही. नारायणसामी यांनी मुख्यमंत्रिपद सोडल्यानंतर विरोधी पक्षाने सरकार स्थापनेस नकार दिला होता. परिणामी, घटनात्मक पेचप्रसंग टाळण्यासाठी राष्ट्रपती राजवट लागू करणे हाच एक उपाय होता. उपराज्यपाल सुंदरराजन यांनी त्यांच्या अहवालात राष्ट्रपती राजवटीची सूचना केली होती. हा अहवाल राष्ट्रपतींना मिळाल्यानंतर त्यांनी तो विचारार्थ केंद्रीय मंत्रिमंडळाकडे पाठवला. या अहवालावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत विचार करण्यात आला. नंतर राष्ट्रपती राजवट प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. येत्या दोन महिन्यांमध्ये या केंद्रशासित प्रदेशात अन्य चार राज्यांसह विधानसभा निवडणूक होत आहे.









