ऑनलाईन टीम / पुणे :
उत्तर प्रदेशातील हाथरस या ठिकाणी दलित समाजाच्या मनिषा वाल्मिकी या तरुणीवर ज्या क्रुर पद्धतीने अत्याचार करण्यात आले आणि त्यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला, त्या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी झोपडपट्टी सुरक्षा दलातर्फे आज अलका चाैक येथे ‘योगी सरकार बांगड्या भरो’ आंदोलन करण्यात आले. झोपडपट्टी सुरक्षा दलाचे संस्थापक अध्यक्ष भगवानराव वैराट यांच्या नेतृत्वाखाली सदर आंदोलन झाले.
यावेळी वंदना पवार, गणेश लांडगे, महमंद शेख, सुरेखा भालेराव, प्रदीप पवार, दत्ता कांबळे, संतोष सोनवणे, संतोष बोतालजी, वामन कदम आदी प्रमुख पदाधिका-यांसह शेकडोच्या संख्येने झोपडपट्टी सुरक्षा दलाचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी योगी सरकार विरोधात घोषणा बाजी करुन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगीराज यांच्या पुतळ्याला बांगड्या भरून प्रतिकात्मकरीत्या आंदोलन करण्यात आले.
योगी सरकारने घेतलेले झोपेचे सोंग मोडून काढण्याचा प्रयत्न या आंदोलनाद्वारे करण्यात आला आहे. मात्र, भविष्यात या प्रकरणातील आरोपींना योगी सरकारने योग्य शासन न केल्यास आंदोलन अधिकाधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा देखील झोपडपट्टी सुरक्षा दलाचे संस्थापक अध्यक्ष भगवानराव वैराट यांनी यावेळी दिला.








