भवानी पेठेतल्या गुरुदत्त शेजवळांनी केलाय टेरेसवर रेन वॉटर हार्वेस्टिंग
सहयोग सोसायटीतल्या शिवकुमार काळेंनी घरातच ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती
विशाल कदम / सातारा :
शहरात काही नागरिक सतत नाविण्याचा विचार करत असतात. आपल्यापासून दुसऱ्याला तोटा होणार नाही. निश्चितच पर्यावरणाचा समतोल कसा राखला जाईल यासाठी कार्यरत असतात. असेच भवानी पेठेतल्या गुरुदत्त शेजवळांनी त्यांच्या शिवनेरी अपार्टमेंटच्या टेरेसवरच रेन वॉटर हार्वेस्टिंग सुरु केले. पाण्याच्या बचतीतून पाणी वाचवा हा संदेश त्यांनी दिला आहे. तर पिरवाडीतील सहयोग सोसायटीचे शिवकुमार काळे यांनी घरातच कंपोस्ट खत निर्मिती केली आहे. ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती आणि तयार केलेले खत बागेला वापरले जात आहे.
नुकतेच सातारा पालिकेत माझी वसुंधरा अभियान सुरु झाले आहे. या अभियानाची कुठेही वाश्चता व चर्चा नाही. परंतु पालिकेच्या आरोग्य विभागाने नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्या सुचनेनुसार आरोग्य विभागाने या अभियानाचे काम सुरु केले आहे. तत्पूर्वीच सातारा शहरात काही नागरिकांनी शहराचे व आपल्या आजुबाजूच्या पर्यावरणाचा कसा समतोल राखला जाईल, याकरिता स्वतःच घरात नाविण्यपूर्ण प्रयोग सुरु केल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडूनच देण्यात आली आहे. त्यामध्ये पाण्याची बचत करण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग हा उप्रकम महत्वाचा ठरतो.
भवानी पेठेतल्या शिवनेरी अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या गुरुदत्त शेजवळ यांनी टेरेसवर हा प्रकल्प सुरु केला. टेरेसवरचे पाणी शोषखड्डय़ात सोडले. त्यामुळे त्यांच्या अपार्टमेंटच्या कुपनलिकेचे पाणी वाढले आहे. तसेच नुकताच हद्दवाढीत आलेल्या पिरवाडी भागातले शिवकुमार काळे यांनी त्यांच्या सहयोग सोसायटीतला ओला कचरा घंटागाडीत न टाकता त्यावर घरीच प्रक्रिया करुन कंपोस्ट खत निर्मिती केली आहे. तयार झालेले खत सोसायटीतल्या बागेतच वापरले जाते. विशेष म्हणजे घंटागाडीत ओला कचराच टाकला जात नाही.
गुरुदत्त शेजवळ शिवनेरी अपार्टमेंट,भवानी पेठ
रेन वॉटर हार्वेस्टिंग टेरेसवर करण्यात आले आहे. एका टेरेसवरुन दुसऱ्या टेरेसवरील पाणी पाईपलाईनद्वारे शोष खड्डय़ात सोडले गेले आहे. त्यामुळे बोअरलवेलच्या पाण्याची पातळी पाच फुटांनी वाढली आहे. नजिकच्या विहिरीचीही पाणी पातळी वाढली आहे. वर्षाला 4 लाख लिटर पाणी वाचवले. पावसाचा थेंब वाचवला आहे. दर मार्च, मेमध्ये टेरेसची स्वच्छता केली जाते. तसेच दर महिन्याला सोसायटीत सुके प्लास्टिक साठवून ते कंपनीला रिसायकल करायला दिले जाते. त्यामुळे पर्यावरणाची हानी टळते.
शिवकुमार काळे सहयोग सोसायटी, पिरवाडी
गेली चार वर्षापासून ओला कचरा घंटागाडीत टाकत नाही. ओल्या कचऱ्याचे खतात रुपांतर करतो आम्ही. ओला कचऱ्यापासून खत निर्मिती केली जाते. घरात तयार होणारा ओला कचरा थोडासा बारिक करुन त्याच्यावर प्रक्रिया करुन घरातच कंपोस्ट खत बनवता येते. तयार झालेले खत बागेसाठी आणि झाडासाठी वापरु शकतो. ओला कचऱ्यापासून घरातल्या घरात खत निर्मितीकरुन पर्यावरणाची अतिशय चांगली मदत आपण करु शकतो.









