उपमुख्यमंत्री डॉ. अश्वथ नारायण यांचे स्पष्टीकरण
प्रतिनिधी/ बेंगळूर
कोरोना परिस्थितीतही यंदा परीक्षा आणि शैक्षणिक कार्यक्रम थांबणार नाहीत. परीक्षा झाल्यानंतर विद्यापीठ पातळीवर पदवी, पदव्युत्तर आणि अभियांत्रिकी, डिप्लोमासह उच्च शिक्षणाच्या व्याप्तीमध्ये येणाऱया विद्यार्थ्यांना उन्हाळी सुटी असणार नाही. पुढील शैक्षणिक वर्षात कार्यक्रम नेहमीप्रमाणे सुरू होणार आहेत, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री तथा उच्च शिक्षणमंत्री डॉ. सी. एन. अश्वथ नारायण यांनी दिले आहे.
शनिवारी बेंगळूरमध्ये संस्कृत विद्यापीठाच्या आठव्या पदवीदान समारंभात सहभागी झाल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. विद्यापीठ पातळीवर पदवी, पदव्युत्तर आणि अभियांत्रिकी, डिप्लोमासह उच्च शिक्षणाच्या व्याप्तीमध्ये येणाऱया कोणत्याही विभागाच्या परीक्षा नियोजनाप्रमाणे होतील. यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल असणार नाही. परीक्षा झाल्यानंतर उन्हाळी सुटी न देता ऑनलाईन किंवा ऑफलाईन वर्ग सक्तीने सुरू केले जातील, अशी माहिती डॉ. अश्वथ नारायण यांनी दिली.
सध्या सुरू असलेले शैक्षणिक वर्ष चार-पाच महिने विलंबाने सुरू झाले होते. त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. येत्या शैक्षणिक वर्षात असे नुकसान होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल. एखाद्या वेळेस शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास विलंब झाल्यास अभ्यास, परीक्षा, उत्तीर्ण, रोजगार किंवा पुढील शिक्षणाची साखळी विस्कळीत होईल. त्यामुळे परीक्षेनंतर सुटी न देता महाविद्यालये सुरू करण्यात येतील, असा पुनरुच्चार त्यांनी केला.
पुढील शैक्षणिक वर्षात म्हणजे 2021-22 सालातील शैक्षणिक कार्यक्रमामध्ये कोणत्याही अडचणी निर्माण होणार नाहीत. परीक्षा झाल्यानंतर लगेच पुढील शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होईल. कोरोना परिस्थिती विचारात घेऊन वर्ग कोणत्या स्वरुपात भरवता येईल याचा निर्णय घेतला जाईल. ऑनलाईन किंवा ऑफलाईन वर्ग असतील. सुरुवातीला ऑनलाईन वर्ग सुरू होतील. विद्यार्थ्यांना दोन्हीपैकी एका वर्गासाठी सक्तीने हजर व्हावे लागेल. जे विद्यार्थी महाविद्यालयाला येतील त्यांच्यासाठी सर्व प्रकारची सुरक्षा व्यवस्था करण्यात येईल. कोविड मार्गसूचीनुसार सर्व व्यवस्था आतापासूनच केली जात आहे. वर्ग खोल्यांचे सॅनिटायझिंग, स्वच्छता, कोविड चाचणी, शारीरिक अंतर आणि मास्कचा वापर सक्तीचे असणार आहे, असे ते म्हणाले.
1.60 लाख विद्यार्थ्यांना मोफत टॅब
कोरोनामुळे सध्या समग्र अध्ययन व्यवस्थापन पद्धत (एलएमएस) जारी करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना कोठेही बसून शिकता येते. यासाठी यंदा सरकारी कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱया 1.60 लाख विद्यार्थ्यांना मोफत टॅब देण्यात आले आहेत. मागील वर्षी 1.10 लाख विद्यार्थ्यांना टॅब देण्यात आले होते. वर्ग खोल्या स्टुडिओप्रमाणे रुपांतरीत झाल्याने ते स्मार्ट क्लास झाले आहेत. विद्यार्थ्यांना घरातूनच शिक्षण पुढे सुरू ठेवता येते, असेही त्यांनी स्पष्ट केले.









