बेळगावचे माजी जिल्हाधिकारी,माजी आयुक्त
पुणे / प्रतिनिधी
माजी केंदीय सचिव, बेळगावचे माजी जिल्हाधिकारी व माजी विभागीय आयुक्त तसेच गोवा विद्यापीठाचे पहिले कुलगुरू पद्मभूषण डॉ. पद्माकर दुभाषी यांचे सोमवारी सकाळी पुण्यात अल्पशा आजाराने निधन झाले. ते 90 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून असा परिवार आहे. येथील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
डॉ. दुभाषी यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. डॉ. दुभाषी यांचा जन्म 7 मार्च 1930 मध्ये कारवार येथे झाला. पुणे विद्यापीठातून त्यांनी एम. ए. व पीएचडीची पदवी संपादन केली. तर मुंबई विद्यापीठातून डीलिट पदवी मिळविली. त्यानंतर डॉ. दुभाषी हे 1953 मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू झाले. डॉ. दुभाषी यांनी राज्य तसेच केंदात अनेक महत्त्वपूर्ण पदांवर काम केले. त्यात विभागीय आयुक्त, कृषी मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनचे संचालक, पंतप्रधान कार्यालयाचे सचिव आदी पदांचा समावेश होता. ब्रिटिश कौन्सिलची शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर त्यांनी त्याद्वारे 1963 मध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पदव्युत्तर पदवीही संपादन केली. याशिवाय अनेक सरकारी समित्यांचे प्रमुख म्हणून त्यांनी उल्लेखनीय काम केले. 1981 मध्ये निवृत्त झालेल्या डॉ. दुभाषी यांनी त्यानंतरही प्रशासकीय स्तरावर मोलाचे योगदान दिले.
बेळगावचे जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त म्हणून ठसा
बेळगाव जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त म्हणूनही डॉ. दुभाषी यांनी ठसा उमटविला होता. 1975 च्या आसपास त्यांनी ही पदे भूषविली. त्यावेळची परिस्थिती कठीण होती. त्यांनी ती अत्यंत कौशल्याने हाताळली. बेळगावच्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये ते सहभागी होत असत. सीमालढय़ाचे अग्रणी बाबुराव ठाकुर यांच्याशीही त्यांचे अत्यंत जिव्हाळय़ाचे संबंध होते. ते सर्व भाषिकांमध्ये लोकप्रिय बनले होते.
गोवा विद्यापीठाचे पहिले कुलगुरू
1990 ते 1995 या काळात त्यांनी गोवा विद्यापीठाचे कुलगुरुपद भूषविले. त्यांची ही कारकीर्दही संस्मरणीय ठरली. पुण्यातील भारतीय विद्या भवनच्या पुणे केंद्राचेही ते अध्यक्ष होते.
27 पुस्तकांसह ‘तरुण भारत’मध्येही स्तंभलेखन
सार्वजनिक प्रशासन, राज्य शास्त्र, पंचायतराज, अर्थव्यवस्था आदी विषयांवर त्यांनी 27 पुस्तके लिहिली असून, त्यातील सहा पुस्तके ही मराठीतील आहेत. याशिवाय ‘तरुण भारत’मध्येदेखील त्यांनी स्तंभलेखन केले. केंद्रात कार्य करीत असताना त्यांनी 30 हून अधिक देशांना भेटी दिल्या.
पद्मभूषण पुरस्काराने सन्मान
भारतीय प्रशासकीय सेवेत काम करीत असताना त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले. 1993 साली त्यांना शिरोमणी पुरस्कार, मसापचा लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख पुरस्कार, पॉल एच ऍपलबी पुरस्कार प्राप्त झाला. याशिवाय प्रशासकीय सेवेतील योगदानाबद्दल त्यांना 2010 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.









