आरक्षणासाठी केंद्र-राज्य सरकारचे वेधले लक्ष
प्रतिनिधी / बेळगाव
पंचमसाली लिंगायत समाजाचा दोन अ प्रवर्गामध्ये समावेश करावा व आम्हालाही आरक्षण द्यावे, या मागणीसाठी सुवर्ण विधानसौधसमोर एक दिवसाचे उपोषण आंदोलन केले. कुडलसंगम येथील जगद्गुरु बसव जयमृत्युंजय स्वामीजी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
राज्य व केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पंचमसाली लिंगायत समाजाने हे आंदोलन छेडले. या समाजातील अनेक कुटुंबे आर्थिक आणि शैक्षणिकदृष्टीने मागासलेली आहेत. हा समाज शेतीवर अवलंबून आहे. कर्नाटकात मोठय़ा संख्येने हा समाज असून या समाजाच्या विकासासाठी आरक्षणाची नितांत गरज आहे. तेव्हा याचा विचार करून दोन अ प्रवर्गामध्ये समावेश करावा, अशी मागणी करण्यात आली.
बुधवारी कित्तूर राणी चन्नम्मा यांच्या पुतळय़ाला कुडलसंगमचे जगद्गुरु बसव जयमृत्युंजय स्वामीजी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून रॅलीला सुरुवात करण्यात आली. डॉ. बी. आर. आंबेडकर, संगोळ्ळी रायण्णा आणि हिरेबागेवाडी येथील विश्वगुरू बसवण्णा यांच्या पुतळय़ांनाही अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सुवर्णसौधसमोर दिवसभर उपोषण करून ही मागणी केली. या ठिकाणी आमदार व खासदारांनीही भेट दिली. आंदोलनात माजी खासदार मंजुनाथ कोन्नूर, पी. सी. सिद्धनगौडर, जि. पं. सदस्या रोहिणी पाटील, पंचमसाली युवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजशेखर मेनसीनकाईसह लोकप्रतिनिधी व नागरिक उपस्थित होते. दुपारी उपोषण मागे घेण्यात आले.









