महाबळेश्वर / प्रतिनिधी :
वटवाघळांमधून पसरणारा ‘निपाह’ हा व्हायरस महाबळेश्वरच्या जंगलातील गुहेमध्ये सापडल्याचा दावा पुणे येथील नॅशनल इन्स्टिटयुट ऑफ व्हायरोलाॅजीच्या शास्त्रज्ञांनी केला आहे. तसा अहवाल त्यांनी प्रसिध्द करताच राज्यात खळबळ उडाली. दरम्यान, या व्हायरसचा प्रादुर्भाव झालेला एकही रूग्ण महाबळेश्वर परीसरात नाही. त्यामुळे शास्त्रज्ञांनी केलेल्या या दाव्याबाबत नागरिकांकडून शंका व्यक्त केली जात आहे.
महाबळेश्वरपासून दहा किमी अंतरावर मालुसरवाडी हे गाव आहे. या गावापासुन एक किमी अंतरावर ‘राॅबर्स केव्ह’ या नावाची गुहा आहे. याला स्थानिक भाषेत ‘सीमसीम घळ’ असेही म्हणतात. या गुहेत गेली अनेक वर्षांपासुन वटवाघळांची वसाहत आहे. वटवाघळांच्या अनेक जाती आहेत, परंतु महाबळेश्वरच्या जंगलातील या गुहेत वटवाघळाची जी जात आहे. ती जगात दुर्मिळ आहे. मार्च 2020 मध्ये पुणे येथील नॅशनल इन्स्टिटयुट ऑफ व्हायरोलाॅजीच्या शास्त्रज्ञांनी वटवाघळांचे नमुने गोळा केले. यावर त्यांनी संशोधन करून त्याचा अहवाल नुकताच प्रसिध्द केला आहे. या अहवालानुसार महाबळेश्वर येथील जंगलातील ज्या गुहेत दुर्मिळ प्रजातीची वटवाघळे आहेत, त्यातील दोन वटवाघळांमध्ये ‘निपाह’ हा अतिघातक व्हायरस सापडला आहे.
‘निपाह’ हा व्हायरस कोरोनापेक्षा अधिक घातक आहे. कारण कोरोनाचा मृत्यु दर हा दोन टक्के आहे. परंतु निपाहचा मृत्यू दर हा 65 ते 100 टक्के आहे. असा हा घातक व्हायरस महाबळेश्वरच्या जंगलात आढळल्याने चांगलीच खळबळ माजली आहे. गुहेच्या पाहणीसाठी आज येथील काही पत्रकार गेले होते. महाबळेश्वर तापोळा रस्त्यावर सात किमी अंतर पार केल्यानंतर मालुसर गावाकडे जाणारा रस्ता लागतो. त्या रस्त्याने एक किमी पुढे गेले की, गावाची वस्ती लागते. त्या वस्तीतुन घनदाट जंगलातील पाय वाटेने गुहेकडे जाता येते. तेथे गेल्यानंतर भला मोठा खड्डा दृष्टीस पडतो. खड्ड्यात थोडे उतरल्या नंतर पुन्हा विहीरीसारखा एक खड्डा आणि त्या मधुन जमिनीखाली गेलेली गृहा दृष्टीस पडते. याच गुहेत वटवाघळे असतात. उन्हाळयात या ठिकाठी वटवाघळांच्या विष्ठेचा विशिष्ट उग्र वास येतो. परंतु आता पावसाळी वातावरण असल्याने तेथे अशा प्रकारे कोणताही वास आला नाही. वरून पाण्याचे प्रवाह या गुहेत पडत होते. या गुहेला लागुनच एक साताआसरा देवीचे छोटे मंदीर आहे. या मंदीरात पुजारी रोज येवुन देवीची पुजा करतो. त्याचप्रमाणे याच भागात जे पठार आहे, त्या पठारावर येथील स्थानिक लोक आपली जनावरे चरण्यासाठी घेवुन येतात. मंदीरातील देवीच्या दर्शनासाठीही परीसरातील भाविक या गुहे जवळ येतात.
पुण्यातील शास्त्रज्ञांनी केलेल्या दाव्याप्रमाणे वटवाघळामध्ये निपाह हा व्हायरस असला तरी या व्हायरसचा प्रादुर्भाव स्थानिक लोकांना कधीच झाला नाही. निपाह या विषाणुची लक्षणे असलेला रूग्ण या भागात कधी आढळला नाही. ज्या कोरोनाने जगात थैमान मांडले आहे त्या कोरोनाची लागण या गुहेजवळ असलेल्या मालुसर गावातील एकाही व्यक्तीला झाली नाही, असा दावा या गावचे जेष्ठ नागरीक व माजी सरपंच इक्बाल मुलाणी यांनी केला.
आज या संदर्भात सातारा जिल्हाधिकारी शेखर सिह यांनी देखील निवेदन दिले आहे, त्यांच्या म्हणण्यानुसार निपाह हा विषाणु जरी धोकादायक असला तरी वटवाघळामधुन मनुष्याला प्रादुर्भाव होण्याची शक्यता अगदी नगण्य आहे. त्यामुळे सध्यातरी या विषाणुमुळे घाबरण्याचे कारण नाही.
एक ते दोन टक्का मृत्युदर असलेल्या कोरोनामुळे आधीच महाबळेश्वरसारखे पर्यटन स्थळावरील नागरीकांची आर्थिक घडी विस्कटली आहे. आणि कोरोनापेक्षा अधिक घातक असलेला विषाणुचा प्रसार झाला तर महाबळेश्वर सारखे पर्यटन स्थळावरील नागरीकांच्या रोजी रोटीचा प्रश्न गंभीर होण्याचा धोका असल्याने या शहरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. त्यांनी आपल्या व्यवसायाबाबत चिंता व्यक्त केली आहे. अनेकांच्या म्हणण्याप्रमाणे शास्त्रज्ञांनी केलेल्या हा दाव्याची सत्यता पुन्हा तपासून पाहिली पाहीजे. त्यामध्ये सत्यता असेल तर ती गुहा कायमची बंद करून तो व्हायरस हा गुहेतून बाहेर येणार नाही, याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी, अशी मागणी नागरीकांनी केली आहे.









