नाणार परिसरातील तलाठी कार्यालयात तक्रार स्वीकृती कक्ष स्थापन
वार्ताहर / राजापूर
तालुक्यातील नाणार परिसरातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प परिसरात झालेल्या जमीन व्यवहारांची चौकशी करून भूमिपुत्रांना त्यांच्या जमिनी परत करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठी संबंधित गावातील तलाठी कार्यालय तसेच राजापूर प्रांत कार्यालयात तक्रार स्वीकृती कक्ष स्थापन करण्यात आला असून 31 मार्चपर्यंत भूमीपुत्रांकडून तक्रारी अथवा निवेदने स्वीकारली जाणार आहेत.
राजापूर तालुक्यातील नाणार आणि लगतच्या चौदा गावांमध्ये रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित झाल्यानंतर या परिसरात मोठय़ा प्रमाणात जमिनींचे खरेदी-विक्री व्यवहार झाले होते. स्थानिक शेतकऱयांच्या जमिनी परप्रांतीयांनी कवडीमोल दराने विकत घेतल्याचे पुढे आले होते. त्यामुळे या खरेदी-विक्री व्यवहारांची चौकशी करून फसवणूक झालेल्या शेतकऱयांना त्यांच्या जमिनी परत मिळाव्यात, अशी मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर तत्कालीन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी राजापूर तालुक्यातील होऊ घातलेल्या रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पातील जमिनीच्या गैरव्यवहाराची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आता प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरूवात झाली आहे. नाणार परिसरातील झालेल्या जमीन खरेदी-विक्री व्यवहारांची चौकशी करून भूमीपुत्रांना त्यांच्या जमिनी परत करण्यासाठी स्थानिक पातळीवर ज्या-ज्या शेतकऱयांच्या तक्रारी आहेत, अशा तक्रारींच्या संकलनासाठी तलाठी कार्यालयात तक्रार स्वीकृती कक्ष स्थापन करण्यात येणार आहेत. त्या ठिकाणी 15 ते 31 मार्च 2021 पर्यंत तक्रार, निवेदन स्वीकारण्यात येणार आहेत. तारळ, कुंभवडे, साखर, सागवे, वाडापाल्ये, नाणार, उपळे, विल्ये, डोंगर, कात्रादेवी या ठिकाणी तक्रार स्वीकृती कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. तलाठी स्तरावर येणाऱया तक्रारी प्रांताधिकारी कार्यालयात भूसंपादन शाखेतील तक्रार स्वीकृती कक्षाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात येणार आहेत. या तक्रार स्वीकृती कक्षात लिपिक व अव्वल कारकून यांची नियुक्ती करण्यात आली आहे.









