प्रतिनिधी / कणकवली:
मुंबई गोवा महामार्गाचे काम अंतिम टप्यात असले तरी हायवेच्या निर्मितीमध्ये होत असलेला विलंब, कामाचा निकृष्ट दर्जा, प्रलंबित कामे, नियोजनाचा आणि नागरी सुखसोयींचा अभाव या बाबी अजूनही तशाच आहेत. त्यामुळे याचा निषेध नोंदविण्यासाठी बुधवारी सकाळी नांदगाव तिठा येथे कोकण हायवे समन्वय समितीच्यावतीने जनआंदोलन करण्यात आले. यावेळी कोकण महामार्गावर विविध अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या कोकणवासियांना मानवी साखळीद्वारे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
जनआंदोलनामध्ये आणि मानवी साखळीमध्ये समृद्ध कोकण संघटनेचे संचालक डॉ. दीपक परब, समृद्ध कोकण संघटना आणि कोकण हायवे समन्वय समितीचे मुख्य समन्वयक उत्तम दळवी, मुख्य संयोजक सुरेश मोरये तसेच स्थानिक नांदगाव समन्वयक समितीचे पंडित रावराणे, प्रणय तांबे, यासीन बटवाले, दत्ताराम अमृते, नरेंद्र सावंत, सुरेंद्र राणे, सुरेश डामरे, रजाक बटवाले, आदी कोकण हायवे समन्वय समितीचे पदाधिकारी, तसेच नांदगाव दशक्रोशीतील रहिवासी, नांदगाव तिठा येथील व्यापारी, रिक्षा चालक उपस्थित होते. डॉ. दीपक परब यांनी आंदोलनामागची रुपरेषा स्पष्ट करीत न्याय्य हक्कासाठी नेहमी रस्त्यावरही उतरु असे सांगितले. उत्तम दळवी यांनी समृद्ध कोकण संघटना आणि कोकण हायवे समन्वय समितीची कोकण महमार्गासंबधीची तसेच भविष्यात कोकणात येणाऱया इतर इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्पामध्ये असणारी भूमिका मांडली. यावेळी हायवेवर अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच हायवेबाबतचे प्रश्न प्रलंबित राहिल्याने काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात आला. शेवटी सुरेश मोरये यांनी आभार मानले.









