नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारताने गेल्या सात वर्षांमध्ये शस्त्रबळ वाढविण्यास प्राधान्य दिले आहे. मात्र विदेशी शस्त्रांपेत्रा भारत निर्मित अत्याधुनिक शस्त्रांच्या निर्मितीचे ध्येय ठेवले आहे. या प्रयत्नाला यश आले असून भारतीय संरक्षण आणि विकास संस्था निर्मित ध्रूवास्त्र या क्षेपणास्त्राची शुक्रवारी यशस्वी चाचणी करण्यात आली.
या क्षेपणास्त्रची क्षमता शत्रू सैन्याचे रणगाडे भेदण्याची आहे. शुक्रवारच्या परिक्षणात या क्षेपणास्त्राने काही अंतरावरील मुख्य लक्ष्याचा अचूक भेद यशस्वीरित्या केला. अशा आणखी चाचण्या भविष्यकाळा घेतल्या जाणार आहेत. त्यानंतर येत्या तीन वर्षांमध्ये ही क्षेपणास्त्रे सैन्यात नियुक्त केली जातील.
हे क्षेपणास्त्र भूमीवरून भूमीवर मारा करणारे आहे. त्याचा वायुतील वेग 320 मीटर प्रतिसेकंद इतका आहे. याचाच अर्थ असा की ते एका तासात 828 किलोमीटर जाते. हे तिसऱया पिढीतील अस्त्र आहे. ‘डागा आणि विसरा’ या तत्वावर ते कार्य करते. एकदा ते डागल्यानंतर स्वतःहून लक्ष्याचा शोध घेऊन त्याचा भेद करते. लक्ष्य हलते असले तरी ते त्याचा अचूक वेध घेते.
त्याचे वजन किमान 45 किलो असून ते 6 फूट लांब आहे. त्याचा व्यास साधारणतः 8 इंच असून त्यात 8 किलो स्फोटके मावतात. त्यामुळे याचा उपयोग मोठय़ा आणि मजबूत लक्ष्यांचा भेद करण्यासाठी केला जाऊ शकतो.
तणावाच्या पार्श्वभूमीवर
सध्या लडाखच्या सीमारेषेवर भारत आणि चीन यांच्या सेना समोरासमोर आहेत. तसेच त्यांच्यात युद्धाची ठिणगी पडण्याची शक्यता अद्याप पूर्णतः दूर झालेली नाही. अशा परिस्थितीत भारताकडे शत्रूचे रणगाडे, चिलखती गाडय़ा आणि इतर अवजड साधने भेदण्याचे साधन असणे आवश्यक आहे. यासाठी या क्षेपणास्त्राच्या निर्मितीला गतीमान करण्यात आल्याचे सांगण्यात आले.









