माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांचे वक्तव्य : देशभक्ती ही सकारात्मक संकल्पना असल्याचेही मत
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोनाआधी देश धार्मिक कट्टरता आणि उग्र राष्ट्रवाद या दोन महामारीने ग्रस्त आहे, असे वक्तव्य माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी केले आहे. काँग्रेस नेते शशी थरुर यांच्या ‘द बॅटल ऑफ बिलॉन्गिंग’ या नव्या पुस्तकाच्या डिजिटल प्रकाशनावेळी ते बोलत होते. कोरोना संसर्ग ही अतिशय वाईट महामारी आहे परंतु याआधी आपला समाज धार्मिक कट्टरता आणि उग्र राष्ट्रवाद या दोन महामारीने ग्रस्त आहे, असे अन्सारी म्हणाले. तसेच “धार्मिक कट्टरता आणि उग्र राष्ट्रवादापेक्षा देशभक्ती ही सकारात्मक संकल्पना असल्याचेही त्यांनी नमूद केले
आज आपला देश कोरोना विषाणूच्या महामारीशिवाय आणखी दोन धोक्यांचा सामना करत आहे. कोरोनापेक्षा त्यांच्यापासून अधिक सावध राहायला हवे. भारताला धार्मिक कट्टरता आणि प्रखर राष्ट्रवादाने ग्रासले आहे. मात्र या दोघांच्या तुलनेत देशभक्ती अधिक सकारात्मक संकल्पना आहे, असेही ते म्हणाले.
गेल्या चार वर्षात भारताने सामाजिक देशप्रेमापासून राजकीय सांस्कृतिक राष्ट्रवादाकडे प्रवास केल्याचे ते म्हणाले. अन्सारी यांच्या या विधानानंतर भाजप नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रीया येऊ लागल्या आहेत. भाजप नेत्यांनी या विधानावर नाराजी व्यक्त करत अन्सारी यांच्यावर टीका केली आहे. अन्सारी आपल्या रोखठोक वक्तव्यासाठी ओळखले जातात. आपली मते ते कायमच स्पष्टपणे मांडत असतात. त्यांच्या वक्तव्यांमुळे अनेकदा वादही निर्माण झाले आहेत.









