ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रातील कोरोना संकट काही थांबायचे नाव घेत नाही आहे. त्यातच दररोज वाढणारी रुग्ण संख्या आणि वाढत्या मृत्यू प्रमाणाला आळा बसवा तसेच राज्यात निर्माण झालेली रेमडेसिवीरची प्रचंड टंचाईयासंबंधी चिंता व्यक्त करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले आहे.

या पत्रात त्यांनी रेमडेसिवीरचा काळाबाजार आणि त्यामुळे गरीब रूग्णांचे होत असलेले अतोनात हाल आणि त्यामुळे मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे, असे सांगत या प्रकारात तातडीने हस्तक्षेप करत गरीब रुग्णांना खाजगी आणि सरकारी रुग्णालयात हे औषध मोफत उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी पत्रात लिहले की, राज्यात दर दिवशी सरासरी सुमारे 20 हजार कोरोना रुग्णांची भर पडते. दररोज सरासरी 450 ने मृतांची संख्या वाढते आहे. अशात रेमडेसिवीर हे उपचारातील एक महत्वाचे औषध आहे, त्यामुळे त्याचा पुरवठा सुरळीत राहील आणि हे सुनिश्चित करणे देखील आवश्यक आहे. पण अनेक जिल्ह्यांमध्ये त्याची उपलब्धता नसल्याने गरीब रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत.
राज्य सरकार उपलब्धतेचे कितीही दावे करत असले तरी रूग्णालयांकडून मात्र टंचाईचेच कारण रूग्णांना सांगितले जात आहे. त्यामुळे रुग्णालयांकडून रूग्णांना थेट केमिस्टकडे ते खरेदी करण्यासाठी जाण्यास सांगितले जाते. याची किंमत लक्षात घेता, ते सामान्यांच्या आवाक्यात नाही. परिणामी त्यांचा मृत्यू होण्याचेही प्रमाण वाढले आहे.
पुढे ते म्हणाले, एकिकडे गरीब रूग्णांचे मृत्यू आणि दुसरीकडे रेमडेसिवीरची काळाबाजारी ही स्थिती अतिशय गंभीर आहे. त्यामुळे नवीन खरेदी प्रक्रिया राबवून जिल्हा प्रशासनांना हा साठा तातडीने उपलब्ध करून देण्यात यावा. त्यासोबतच सर्व गरीब रुग्णांना सरकारी किंवा खाजगी रुग्णालयात सुद्धा रेमडेसिवीर मोफत उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी देखील देवेंद्र फडणवीस यांनी या पत्रामध्ये केली आहे.








