प्रतिनिधी/ सातारा
कार्तिक शुद्ध व्दादशीच्या मुहूर्तावर गुरूवारी तुलसी विवाहाला प्रारंभ झाला आहे. यामुळे तुलसी विवाहाच्या तयारीसाठी घरोघरी लगबग सुरू झाली आहे. पूजा आणि लग्नविधी साहित्य खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडत आहे. तुळशीच्या लग्नासराईस प्रारंभ होणार असल्याने विवाह इच्छुकही तयारी लागले आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना दिवाळीनंतर आता तुळशी विवाहाला प्रारंभ झाला आहे. कार्तिक शुद्ध द्वादशी ते त्रिपुरारी पौणिमेपर्यंत हा सोहळा पाच दिवस सुरू राहणार आहे. पाच दिवसांमध्ये प्रत्येकाच्या सवडीनुसार आपापल्या तुळशींचे विवाह सोहळे पार पाडले जाणार आहेत. तुळशी विवाहानिमित्त घरोघरी तुळशी वृंदावनाची रंगरंगोटी करण्यात येत आहे. लग्नसोहळयासाठी लागणारे ऊस, आवळा, चिंच, बोरे, झेंडूची फुले व हिरव्या बांगडया, काळे मणी तसेच विवाहाचे इतर पूजा साहित्याची बाजारपेठेत रेलचेल वाढली आहे. खरेदीला सकाळपासून गर्दी होत आहे. लग्न सोहळयात अंगणाची शोभा वाढवणारी विविधरंगी रंगोळी काढण्यात येत आहे. फ्लॅट संस्कृतीमध्ये शेतजमीनीवर सिमेंटची जंगले वाढल्यामुळे शहराजवळील शेतकऱयांनाही ऊस, चिंच, बोरं हा रानमेवा विकत घ्यावा लागत आहे. शहरातील पोवईनाका परिसर, भाजी मंडई, राजपथ, राजवाडा आदि ठिकठिकाणी ऊस आणि तुळशी विवाह साहित्य विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहे. गर्दी न करता विक्री करण्याची सक्त आदेश प्रशासनाकडून विक्रेत्यांना देण्यात आले आहेत.








