ऑनलाईन टीम / महाड :
महाड तालुक्यातील तळीये गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत अख्खे गावच नेस्तानाबूत झाले असून त्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. या गावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज भेट दिली. मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण गावची पाहणी करून तेथील गावकऱ्यांशी संवाद साधला.

‘तुमच्यावर कोसळलेला प्रसंग मोठा आहे. त्यामुळे तुम्ही स्वत:ला सावरा. बाकीच्या गोष्टी सरकारवर सोडा. आम्ही तुमचे पुनर्वसन करू. सर्वांना मदत दिली जाईल, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी गावकऱ्यांना धीर दिला आहे.

मुख्यमंत्री भरपावसात चिखलातून वाट काढत दुपारी सव्वा दोनच्या सुमारास घटनास्थळी पोहोचले. यावेळी त्यांनी तळीये ग्रामस्थांना संपूर्ण नुकसान भरपाई दिली जाईल. तसेच त्यांचे योग्य पुनर्वसन केले जाईल, असा शब्द दिला आहे.
पुढे ते म्हणाले, ‘जे काही घडले आहे ते आक्रीत आहे. आजकाल पावसाळ्याची सुरुवात सुद्धा चक्रीवादळाने होते. ही आपत्ती इतकी मोठी होती की मदतीला पोहोचताना जवानांना आणि बचाव पथकांना अनेक अडचणी आल्या. कारण सगळ्या सामुग्रीनिशी त्यांना बचावकार्य करायचे होते. राज्य शासन आपत्तीचा सामना करण्यासाठी तयार होते. केंद्र सरकारने देखील सहाय्य केले आहे. लष्कर, एनडीआरएफ सर्वांनीच मदत केली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. अशा दुर्घटना पाहता डोंगर उतार आणि कडेकपाऱ्यांत राहणाऱ्या वाड्यावस्त्यांना स्थलांतरित करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येईल,’ असेही त्यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले.

यावेळी मृतांच्या आणि बेपत्ता नातेवाईकांनीही आपली कैफीयत मुख्यमंत्र्यांसमोर मांडली. आमचे नातलग, कुटूंबातील व्यक्ती आम्हाला अजुनही सापडलेल्या नाहीत, त्यामुळे आम्हाला या कठीण प्रसंगातून मदत मिळावी अशीही मागणी करण्यात आली. त्यावेळी सरकारी पातळीवर सर्वांना योग्य ती मदत देण्यात येईल असे सांगण्यात आले.
मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांचे तसेच जखमींचे सगळी ओळखपत्रे तसेच शासकीय मदत मिळवून देण्याचेही यावेळी आश्वासन दिले. डॉक्युमेंटचा विचार करू नका ते सरकारचे काम असेही मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री आदिती तटकरे, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, परिवहन मंत्री अनिल परब, मिलिंद नार्वेकर, खासदार सुनील तटकरे, आमदार भरत गोगावले, मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि जिल्हाधिकारी निधी चौधरी आदी होते.









