प्रतिनिधी/कोल्हापूर
तिरुपती देवस्थान ट्रस्टच्यावतीने नवरात्रोत्सवात परंपरेनुसार करवीर निवासिनी अंबाबाईला दिल्या जाणाऱया शालूचे गुरुवारी मंदिरात आगमन झाले. ट्रस्टचे विश्वस्त आमदार भास्कर रेड्डी, विश्वस्त प्रशांती रेड्डी आणि सहकारी शालू घेऊन मंदिरात आले होते. त्यांच्याकडून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव व कोषाध्यक्ष वैशाली क्षीरसागर यांनी शालू स्वीकारला. 1 लाख 5 हजार 600 रुपयांचा हा शालू आहे. गुलाबी-राखाडी असा त्याचा रंग आहेत.
आमदार रेड्डी हे पत्नी लक्ष्मी यांच्यासोबत स्पेशल विमानाने शालू घेऊन उजळाईवाडी विमानतळावर दाखल झाले होते. दुपारी त्यांचे अंबाबाई मंदिरात आगमन झाले. त्यांचे देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव यांनी स्वागत केले. मंदिरात आल्यानंतर रेड्डी यांनी सर्वप्रथम शालूला अंबाबाईच्या चरणी अर्पण केले. विश्वस्त प्रशांती रेड्डी यांच्यासह तिरुपतीहून आलेल्या सुवर्णलता रेड्डी, सुषमा जेट्टी, अर्पणा रेड्डी, जया रेड्डी यांनीही आपल्या सोबत आणलेले 10 ते 15 हजार रुपये किंमतीचे शालू अंबाबाईला अर्पण केले. हे सर्वच शालू देवस्थान समितीचे अध्यक्ष जाधव व कोषाध्यक्ष क्षीरसागर यांनी स्वीकारले. यानंतर अध्यक्ष जाधव यांनी आमदार रेड्डी यांचा तर क्षीरसागर यांनी प्रशांती रेड्डी यांच्यासह अन्य सहकारी महिलांचा सत्कार शाल, श्रीफळ, अंबाबाईचा प्रसाद देऊन सत्कार केला. यावेळी के. रामाराव यांच्यासह देवस्थान समिती सचिव विजय पोवार, सहसचिव शितल इंगवले, सदस्य शिवाजीराव जाधव, राजेंद्र जाधव, अंबाबाई मंदिर व्यवस्थापक धनाजी जाधव आदी उपस्थित होते.









