प्रतिनिधी /नवी दिल्ली :
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने भरपूर राजकारण झालं. महाराजांचा अपमान झाला असता, तर गप्प बसणारा मी नाही, तिथल्या तिथे राजीनामा दिला असता, पण तसं काही झालंच नाही. सभापती व्यंकय्या नायडू यांनी काहीही चुकीचं केलेलं नाही, अशा शब्दात भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी शपथविधीनंतर असे काही घडलेच नसल्याचा दावा केला.
खासदारकीची शपथ घेतल्यानंतर ‘जय भवानी जय शिवाजी’ची घोषणा दिल्याने खासदार उदयनराजे यांना उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी समज दिल्याचे काल समोर आले होते. सभापती व्यंकय्या नायडू यांनी आक्षेप घेतला तो फक्त जे राज्यघटनेत नाही त्याला. माझी हात जोडून राजकारण करणाऱयांना विनंती, आतापर्यंत अनेक गोष्टींवरुन राजकारण झालं, महाराजांचा अवमान झाला असता, तर मी गप्प बसलो नसतो, तिथल्या तिथे राजीनामा दिला असता, असे खासदार उदयनराजे भोसले यांनी सांगितले.
माझा स्वभाव पाहता मी ऐकून घेईन असं वाटतं का तुम्हाला? असा सवाल करुन खासदार उदयनराजे यांनी घटनाक्रम स्पष्ट केला. या सभागृहाचा चेअरमन मी आहे, असं फक्त नायडू म्हणाले. आक्षेप काँग्रेस-राष्ट्रवादीने घेतला, व्यंकय्या नायडूंनी उलट त्यांना थांबवलं, पवारसाहेब तिथेच बसले होते, आपण त्यांना विचारा, जे घडलं नाही, ते भासवण्याचा प्रयत्न करू नका, ही हात जोडून कळकळीची विनंती, असे आवाहनही खासदार उदयनराजेंनी पत्रकार परिषदेत केले. व्यंकय्या नायडू यांनी काही चुकीचं केलं नाही, त्यांनी काही चुकीचं केलं असतं, तर मीच माफीची मागणी केली असती, असेही यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी स्पष्ट केले.
संजय राऊत आमच्याकडे दाखले मागतात आणि आता ते आम्हाला विचारतायेत ? संजय राऊतांना काहीही उत्तर देणार नाही, असे उत्तर उदयनराजे यांनी राऊत यांच्या टीकेला दिले. बाळासाहेब ठाकरे आदरणीय होते, पण शिवाजी महाराज मोठे की बाळासाहेब हा माझा प्रश्न आहे? शिवसेना भवनावर बाळासाहेबांचा फोटो वर आहे, यावर आक्षेप का घेतला नाही? असा प्रतिप्रश्न उदयनराजे यांनी केला. बाळासाहेब मोठे वाटत असतील तर शिवसेनेने ठाकरे सेना नाव ठेवावे, असा टोलाही त्यांनी पत्रकार परिषदेत लगावला.








