ठाणे / प्रतिनिधी
ठाणे जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढत असली तरीही आज अखेर पर्यत तब्बल २ हजार ७७ लोकांनी कोरोनावर विजय मिळविला आहे. ही ठाणे जिल्ह्याच्या दृष्टीने अतिशय दिलासादायक बातमी आहे. कोरोनावर विजय मिळवणाऱ्या विरांमध्ये नवजात बालकापासुन ९१ वर्षाच्या आजीपर्यतच्या सर्वाचा समावेश आहे.
ठाणे जिल्ह्य़ातील कोरोना रुग्णांचे बरे होण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. जिल्ह्य़ात आतापर्यंत तब्बल ३० हजार ३३४ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यातील २२ हजार ९६२ जणांचे अहवाल नकारात्मक आले आहेत. तर ५ हजार ३८८ जण कोरोनाग्रस्त झाले होते. तर आज अखेरपर्यंत १६३ जणांचे मृत्यू झाले आहेत. आज अखेर ठाणे जिल्ह्यात ३ हजार १५१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. हम होंगे कामयाब ही भावना ठेवुन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनखाली महसूल, आरोग्य, पोलीस, महापालिका, जिल्हा परिषद तसेच इतर सर्वच विभाग उपलब्ध सामग्री आणि मनुष्यबळ यांच्या आधारे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या मर्यादित रहावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत.
कोरोना रुग्ण बरे होत असून काळजी करू नका, काळजी घ्या असा विश्वास जिल्हावासियांच्या मनात निर्माण करण्यासाठी जिल्हा यंत्रणेकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. नागरिकांचे सहकार्य आणि जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न या बळावर कोरोना युद्ध जिंकणे सहज शक्य आहे असा विश्वास जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी व्यक्त केला आहे. नागरिकांनी शासनाने वेळोवेळी दिलेल्या आदेशांचे पालन करावे. विनाकारण घराबाहेर पडु नये, सुरक्षिततेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जे परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत त्या परिसरात काटेकोरपणे अंमलबजावणीसाठी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री नार्वेकर यांनी केले आहे.









