बिल न भरणाऱयांचे तोडले जात आहे कनेक्शन : महिनाभर तरी वाट पाहण्याची गरज
प्रतिनिधी / बेळगाव
विजेचे बिल भरण्यास दोन दिवस जरी उशिरा झाला तरी हेस्कॉमकडून त्या ग्राहकाचे कनेक्शन तोडण्यात येत आहे. महिन्याला दिलेले टार्गेट पूर्ण करताना ग्राहकांना थोडीही सूट न देता त्यांच्यावर कारवाईचा बडगा हेस्कॉमकडून उगारला जात आहे. त्यामुळे निदान एक महिनाभर तरी बिल भरण्याची मुभा द्यावी, अशी मागणी ग्राहक करीत आहेत.
प्रत्येक महिन्याचे विजेचे बिल महिन्याच्या 5 तारखेपासून त्या त्या विभागानुसार देण्यात येते. त्यानंतर 10 ते 12 दिवसांचा कालावधी बिल भरण्यासाठी देण्यात येतो. या दरम्यान बिल न भरणाऱया ग्राहकांना बिल भरण्याच्या सूचना यापूर्वी केल्या जात होत्या. प्रत्येक महिन्याला योग्यरीत्या बिल भरणाऱया नागरिकांनी चुकून एखाद्या महिन्यात बिल भरण्यास उशीर केल्यास त्याला पुढील महिन्यापर्यंत मुदत देण्यात येत होती.
परंतु मागील काही महिन्यांपासून बिल न भरलेल्या ग्राहकांचे थेट वीज कनेक्शनच तोडले जात आहे. निदान जे ग्राहक वेळच्या वेळी बिल भरतात अशा ग्राहकांना तरी काही दिवस सूट देणे गरजेचे आहे. मुदत संपताच घरी आलेला लाईनमन दोन दिवसात बिल न भरल्यास कनेक्शन तोडण्यात येईल, असे सांगत असल्यामुळे ग्राहकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. काही कामानिमित्त परगावी गेलेल्या ग्राहकांना याचा फटका बसू लागला आहे. कनेक्शन तोडण्यापूर्वी संबंधित ग्राहकाला याची कल्पना देणे गरजेचे असते. परंतु पूर्वसूचना न देता अनेक वेळा कनेक्शन तोडण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे प्रत्येक महिन्यात वीजबिल वसूल करण्याच्या नादात ग्राहकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केला जात आहे.









