विश्व तिरंदाजी चॅम्पियनशिप
वृत्तसंस्था/ यान्क्टन, अमेरिका
विश्व तिरंदाजी चॅम्पियनशिपमधील कंपाऊंड प्रकारात भारताच्या ज्योती सुरेखा वेन्नम व अभिषेक वर्मा यांनी महिला व पुरुष विभागात सहावे व सातवे स्थान मिळवित तिसरी फेरी गाठली.
पात्रता फेरीत सुरेखाने 684 तर वर्माने 695 गुण मिळविल्यानंतर एलिमिनेशनच्या पहिल्या दोन फेऱयांत त्यांना पुढे चाल मिळाली. मुस्कान किरारलाही महिलांच्या कंपाऊंडमधील एलिमिनेशन पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली. तिने पात्रता फेरीत 29 वे स्थान मिळविले. कंपाऊंड प्रकारात खेळणारी भारताची तिसरी महिला प्रिया गुर्जरची पहिल्या फेरीत ग्रेट ब्रिटनच्या इजाबेल कार्पेन्टरशी लढत होणार आहे. पात्रता फेरीत प्रियाने 51 वे स्थान मिळविले होते. कंपाऊंड प्रकारात खेळणाऱया पुरुष तिरंदाजांत अभिषेक वर्माचे सहकारी संगमप्रीत सिंग व रिषभ यादव एलिमिनेशनच्या पहिल्या फेरीत खेळणार आहेत. पात्रता फेरीत त्यांनी अनुक्रमे 26 व 49 वे स्थान मिळविले.
पुरुषांच्या रिकर्व्ह प्रकारात सुशांत पार्थ साळुंखे, आदित्य चौधरी, अतुल वर्मा एलिमिनेशनच्या पहिल्या फेरीत खेळताना दिसतील. पात्रता फेरीत त्यांनी अनुक्रमे 45, 53 व 56 वे स्थान मिळविले. महिलांमध्ये अंकिता भगत, रिद्धी, कोमलिका बारी यांनी पात्रतेमध्ये 20, 26, 29 वे स्थान मिळवित एलिमिनेशच्या दुसऱया फेरीत स्थान मिळविले. पहिल्या फेरीत त्यांना बाय मिळाला होता.
पुरुषांच्या रिकर्व्ह संघातील सुशांत साळुंखे, आदित्य चौधरी, अतुल वर्मा यांनी पात्रता फेरीत 13 वे स्थान मिळवित एलिमिनेशन फेरी गाठली आहे. यातील पहिल्या फेरीत त्यांचा मुकाबला कॅनडाच्या तिरंदाजांशी होणार आहे. अंकिता भगत, रिद्धी, कोमलिका या महिला रिकर्व्ह संघाने पात्रता फेरीत सातवे स्थान मिळवित एलिमिनेशच्या पहिल्या फेरीत बाय मिळविला. दुसऱया फेरीत त्यांचा मुकाबला जपानच्या तिरंदाजांशी होणार आहे.
वर्मा, संगमप्रीत, रिषभ या पुरुषांच्या कंपाऊंड संघाने पात्रता फेरीत पाचवे स्थान मिळवित एलिमिनेशन पहिल्या फेरीत बाय मिळविला. सुरेखा, मुस्कान, प्रिया या महिलांच्या कंपाऊंड संघाने पात्रता फेरीत पाचवे स्थान मिळविले. एलिमिनेशनच्या पहिल्या फेरीत त्यांची लढत डेन्मार्कशी होणार आहे. ही लढत जिंकल्यास ते उपांत्यपूर्व फेरीत पोहोचणार आहेत.
सांघिक मिश्र रिकर्व्हमध्ये भारताने युक्रेनचा 6-0 असा एकतर्फी धुव्वा उडवित दुसरी फेरी गाठली. त्यांची लढत आता अग्रमानांकित कोरियाशी होणार आहे. सांघिक मिश्र कंपाऊंड प्रकारात अभिषेक वर्मा व सुरेखा यांनी पाचवे स्थान मिळवित पहिल्या फेरीत बाय मिळविला. दुसऱया फेरीत त्यांची लढत आरएएफ संघाशी होणार आहे.
या चॅम्पियनशिपसाठी भारताने 12 युवा तिरंदाजांचे पथक पाठविले असून ऑगस्टमध्ये घेण्यात आलेल्या चाचणीनंतर त्यांची निवड करण्यात आली होती. या चाचणीत ऑलिम्पिकवीर अतानू दास, प्रवीण जाधव, तरुणदीप राय, दीपिका कुमारी यांना पहिल्या तीनमध्ये स्थान मिळविता आले नव्हते. जागतिक अग्रमानांकित दीपिका कुमारीने चौथे मिळविले होते. त्यात कोमलिका बारी, रिद्धी फोर, अंकिता भगत यांनी पहिले तीन क्रमांक मिळवित बाजी मारली होती.









