खडपोलीतील अडरेकर यांचे पोलीस महासंचालकाना पत्र
प्रतिनिधी / चिपळूण
जिल्हय़ात विशेषतः चिपळूण, खेड, लांजा, देवस्ख, रत्नागिरी परिसरात गांजा, चरससह अंमली पदार्थाचा पुरवठा होत असून त्यांची विक्रीही केली जात आहे. यामुळे युवापिढी बरबाद होत चालली असून याचे समुळ उच्चाटन करण्यात यावे, अशी मागणी खडपोली येथील सामाजिक कार्यकर्ते मुराद अडरेकर यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे पत्र पाठवून केली आहे. या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, मला माझ्या गावात तसेच आजूबाजूच्या परिसरात फिरत असताना तरुणवर्ग अंमली पदार्थाच्या नशेच्या आहारी जात असल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आल्याचे निदर्शनास येत आहे. चिपळूण तालुक्यासह जिल्हाभरात अशीच परिस्थिती लोकसंपर्कातून पुढे येत आहे. अनेक ठिकाणावरून शहरात, गल्लीबोळात, ग्रामीण भागात अंमली पदार्थाची विक्री आणि खरेदी राजरोसपणे चालू असते. त्यामुळे तरुणवर्ग शिक्षण पूर्ण होण्यापूर्वी अंमली पदार्थाच्या नशेत येत चालला आहे. या बाबत आम्ही आमच्या माध्यमातून, सोशल मिडियातून व गावोगावी जाऊन, शाळा-महाविद्यालयाच्या माध्यमातून जनजागृती करत आहोत, परंतु सार्वजनिक ठिकाणी छुप्या पद्धतीने गांजा, चरस विक्री चालू असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अंमली पदार्थ गांजा, चरसचा पुरवठा व विक्री करणारे यांचे समूळ उच्चाटन कायमस्वरूपी करण्यात यावे, असेही यामध्ये नमूद केले आहे.








