प्रतिनिधी / महाबळेश्वर
मतपत्रिकेव्दारे मतदान करण्याचा पर्याय जनतेसाठी उपलब्ध करून देण्यासाठी राज्याने विधानमंडळात कायदा करावा अशा सुचना आपण राज्य सरकारला दिल्या असल्याची माहीती विधानसभा अध्यक्ष नानासाहेब पटोले यांनी येथे पत्रकारांशी बोलताना दिली.
एका लग्न समारंभासाठी विधानसभा अध्यक्ष नानासाहेब पटोले हे महाबळेश्वर येथे आले होते. लग्न समारंभानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. ते म्हणाले की आपल्या राज्यातील जनतेच्या मुलभुत अधिकारांची जोपासणा करण्याचे काम राज्य सरकारचे आहे. मतदान हे इलेक्ट्रॉनिक पध्दतीने करायचे का मतपत्रिकेव्दारे हे ठरविण्याचा अधिकार जनतेचा आहे. आणि त्यांना तो घटनेने दिला आहे. हा न्यायिक अधिकार जनतेला बहाल करण्यासाठी आर्टिकल 328 नुसार विधानमंडळात कायदा केला पाहीजे, व तो राज्यपाल व राष्ट्पती महोदयांना सादर केला पाहीजे, म्हणुन आपण तशा पध्दतीचा कायदा करण्याचे आदेशच राज्य सरकारला दिले आहेत. असेही नानासाहेब पटोले यांनी स्पष्ट केले.
नागपुर येथील एका व्यक्तीने विधानसभा अध्यक्ष नानासाहेब पटोले यांचेकडे याचिका सादर करून मतदान मतपत्रिकेव्दारे करण्याचा अधिकार मिळावा अशी मागणी केली या याचिकेवर विचार करून निर्णय घेण्यासाठी विधानसभा अध्यक्ष नानासाहेब पटोले यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईतील विधान भवनात एक बैठक पार पडली या बैठकीला राज्याचे वैदयकिय शिक्षणमंत्री ना अमित देशमुख , विधान परिषद सदस्य अभिजित वंजारी , विधानमंडळ सचिवालयाचे सचिव राजेंद्र भागवत , महराष्ट् राज्य मुख्य निवडणुक अधिकारी बलदेव सिंग व राज्याचे विधी व न्याय विभागाचे सचिव भूपेंद्र गुरव आदी मान्यवर उपस्थित होते.
गेली अनेक वर्षांपासुन देशात सर्वच निवडणुकात इलेक्ट्रॉनिक मशिनचा वापर केला जात आहे. अशा मतदान प्रक्रियेबाबत विश्वार्हता राहीली नसल्याने या पध्दतीला मोठा विरोध होत आहे. परंतु राज्य सरकाने आर्टिकल 328 चा वापर करून केंद्र सरकारला एक प्रकारे आव्हान दिले आहे. असे झाले तर भविष्यात अनेक राज्य अशा प्रकारे कायदा करून राज्यातील निवडणुकासाठी मतपत्रीकेचा पर्याय निवडण्याचा मार्ग राज्यांना खुला होणार आहे त्या मुळे महाराष्ट्राने तसा कायदा करून तो राज्यपाल व राष्ट्पतींकडे पाठविल्यावर तो कायदा तेथेच लालफितीत अडकण्याची दाट शक्यता राजकिय वर्तुळातुन व्यक्त केली जात आहे.








