वार्ताहर/ पाली
मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण करणा-या कंत्राटदाराने आंजणारी (ता. लांजा) येथील काजळी नदीच्या किना-यालगत गतवर्षी मोठय़ा प्रमाणात माती, दगड यांचा भराव आणून टाकल्याने या नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह विरूध्द बाजुच्या किना-याला वाढून तेथील घरांसह पुनसकोंड, कुर्णे जि.प. रस्त्याखालील भरावही पावसाळयामध्ये धुपून जाऊन, मोठा धोका निर्माण झाला होता. तसेच महामार्गावरील आंजणारी नदीवरील पुलाच्या खांबांनाही धोका पोहोचण्याची शक्यता होती. त्यामुळे स्थानिकांनी याबाबत जिल्हा प्रशासनाकडे तक्रार केली होती. त्यानुसार आदेश देऊनही पुढील पावसाळा तोंडावर आल्यावर थोडीशी नदी पात्रातील मातीचा भराव काढून तो तिथेच ठेवण्याचा केवळ दिखावूपणा कंत्राटदाराने केलेला आहे. तरी राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाने कंत्राटदाराकडून कोणतीही ठोस उपाययोजना करुन घेतलेली नाही आहे.
या प्रकाराबाबत कुर्णे ग्रा.पं.हद्दीतील स्थानिक रहिवासी मनोहर कदम, बाब्या दाभोळकर यांनी माहिती देताना सांगितले की, मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या एमईपी या तत्कालीन ठेकेदार कंपनीने गतवर्षी काम करताना माती, मोठे दगड, झाडांचे बुंधे यांचा भराव आणून आंजणारी पुलानजीक काजळी नदीच्या किना-यालगत निवसर रस्त्याच्या बाजूस टाकल्याने, आपोआप नदीचा समतोल वाहणा-या पात्राच्या प्रवाहात अडथळा येऊन, तो प्रवाह विरूध्द बाजुच्या किना-यालगत प्रवाहीत होऊन, तेथील कुर्णे ग्रा.पं. हद्दीतील 5 घरांना पुराचा वारंवार धोका निर्माण झाला होता. तसेच किना-यालगतच्या पुनसकोंड-कुर्णे या दोन गावाच्या रस्त्याच्या खालील भरावाचा भागही धुपून गेला होता. तेथील ग्रामस्थ, विद्यार्थी जीव मुठीत घेऊन, या उपलब्ध एकमेव मार्गाने प्रवास करीत आहेत तसेच याचठिकाणी काजळी नदीवरील आंजणारी येथील मुंबई गोवा महामार्गावरील मुख्य पुलाच्या खांबांनाही या भरावामुळे पात्र बदलून पाण्याचा वेग व वाढलेली फुग यांचा फटका बसून, दुर्घटना घडण्याची शक्यता आहे त्यामुळे दुर्घटना घडण्याच्या अगोदर याबाबत ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्याकडे अर्ज केल्यानुसार त्यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाला पुढील कार्यवाहीचे आदेश दिले होते. त्यानुसार त्यांनी संबंधित महामार्ग ठेकेदाराला तो भराव काढण्याबाबत सांगितले होते. तरी पुढील पावसाळा तोंडावर आल्यावर काजळी नदी पात्रातील थोडासा मातीचा भराव काढून तो तिथेच ठेवण्याचा केवळ दिखावूपणा कंत्राटदाराने केलेला आहे. वास्तविक नदी पात्रातून पूर्ण मातीचा भराव काढून तो पलीकडील धूप झालेल्या किना-या लगत टाकणे आवश्यक होते. आता पावसाळयामध्ये थोडासा काढलेला भराव पुन्हा नदी पात्रात जावून पुर्वी प्रमाणेच पाण्याच्या प्रवाहाला अडथळा येऊन धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. आदेश देऊनही पुढील पावसाळा तोंडावर आला तरी राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाने कंत्राटदाराकडून कोणतीही उपाययोजना करुन घेतलेली नाही आहे. तरी दुर्घटना घडण्याच्या अगोदर याकडे लक्ष देण्याची ग्रामस्थांनी मागणी केली आहे.
चौकटीसाठी ा येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केलेल्या अर्जानुसार राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाने घटना स्थळाची पाहणी करुन संबंधित ठेकेदाराला हा भराव 29 फेब्रुवारी 2020 पर्यंत कोणत्याही परिस्थितीत काढण्याचे आदेश दिले होते. तरीही त्याकडे थोडासा भराव काढून निव्वळ दिखावूपणा करीत मुजोरपणाने कंत्राटदाराने दुर्लक्ष केलेले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाला न जुमानणा-या कंत्राटदारावर कारवाई होणार का? असा प्रश्न ग्रामस्थांमध्ये चर्चेला जात आहे.









