वार्ताहर /उचगाव
बेळगाव-बची (गणेश दूध संकलन केंद्र) ते बेळगाव-राकसकोप (सागर गोडाऊन या रस्त्याचे डांबरीकरण करून जवळपास दीड वर्ष पूर्ण झाले. सदर रस्ता अत्यंत खराब होता. या रस्त्याचे दुरुस्तीकरण, डांबरीकरण पूर्ण झाले. मात्र, सदर रस्ता अतिशय गुळगुळीत झाल्याने या रस्त्यावरून येणारी-जाणारी लहान-मोठी वाहने भरधाव वेगाने जात-येत होती. परिणामी या मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले होते. यासाठी नागरिकांनी, प्रवाशांनी या मार्गावर गतिरोधक घालण्याची मागणी केली होती. त्यानुसार गेल्या दोन-चार दिवसांमध्ये गतिरोधक घालण्यात आले आहेत. मात्र, ते गतिरोधक चुकीचे असल्याने या गतिरोधकावरून रात्रीच्यावेळी मोठे अपघात होत असल्याच्या प्रवासी वर्गातून तक्रारी वाढल्या आहेत. सदर गतिरोधक चांगल्या व योग्य प्रकारे घालावेत, अशी मागणी प्रवासी वर्गातून करण्यात येत आहे. बेळगाव-बाची (गणेश दूध संकलन केंद्र) या मार्गावरील बेळगुंदी फाटा ते सागर गोडाऊन या पट्टय़ामध्ये घालण्यात आलेले तीन स्पीड ब्रेकर चुकीच्या पद्धतीने घालण्यात आलेले आहेत. यासाठी सदर गतिरोधकांच्या दोन्ही बाजूला अशा प्रकारचे नामफलक तसेच या गतिरोधकावर पांढरे पट्टे तातडीने घालण्यात यावेत आणि या गतिरोधकांची पद्धत थोडी बदलावी, अशी मागणी या भागातील असंख्य प्रवासी आणि नागरिकांतून होत आहे.









