‘मॅडम अलीकडे वीणाचे काहीतरी बिनसले आहे. वेगळीच वागते. धड कशातच लक्ष नाही तिचे. मधेच अस्वस्थ असते तर कधी खूप चिडचिड करते. खरंतर ती अशी नव्हती हो. काहीतरी बदल झाला आहे हे नक्की. परवा अचानक दुपारीच ऑफिसमधून आली. मानसी-तिची मुलगी खेळायला शेजारी गेली होती. मानसी घरी नाही हे पाहिल्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली आणि तिकडे का गेली, पाठवलेच कुणी असे अनेक प्रश्न विचारले मला तिने. मीही वैतागले. जरा वादावादी झाली. मानसी घरी आल्यावर वीणा तिला मिठी मारून रडूच लागली. सारं शांत झाल्यावर मी विचारलेही, ‘ऑफिसमधे काही प्रॉब्लेम आहे का? कामाचा काही ताण आहे का? नाही. हे एकच उत्तर.. पण काहीतरी चुकतंय मॅडम.. हल्ली नवीन काय फॅड तर मानसीला हॉलमधेसुद्धा एकटीला बसू देत नाही. जरा पोरीने पंखा लावला आणि खुर्ची घेऊन बसली तर लगबगीने ही धावणार आणि म्हणणार.. मनू.. इथे नको तिथे बस. असे अनेक बाबतीत होते मग मानसीही वैतागते, आजी सांग ना गं आईला असं म्हणत माझ्याजवळ
भुणभुण..’
‘बरं. साधारणपणे किती दिवस सुरू आहे हे?’
गेला महिनाभर हे असंच सुरू आहे. तुम्ही मानसीच्या बाबांजवळ बोललात का याविषयी? हो. चार दिवसांपूर्वीच बोलले. तोही खूप बिझी असतो. रोज धावपळ, कामाचा ताण. यामधे त्याला मनःस्ताप नको म्हणून इतके दिवस बोलले नव्हते. त्यालाही वीणामधे झालेला बदल जाणवतो. काहीवेळा आपल्यातच हरवल्यासारखी असते, कधी लक्षच नसतं.. पूर्वीसारख्या गप्पा मारत नाही. पण त्यालाही वाटलं कामाच्या दगदगीने असे होत असेल. त्यांनी बाकी काही चर्चा न करता दोन दिवस बदल म्हणून त्यांच्या मित्राच्या फार्म हाऊसवर जायचे ठरवले. ही सुरुवातीला हो म्हणाली पण नंतर नको ते फार्म हाऊस म्हणत काही कारण न सांगता बेत रद्दच केला. एरवी हौसेने बाहेर पडणारी ही मुलगी. हिला काय झालं असेल हा प्रश्न त्यांनाही पडलाच आहे. त्यांनीही बोलायचा प्रयत्न केला तिच्याजवळ! परंतु, ती काही नाही म्हणून विषयच बदलते. काय करावे कळत नाही. काहीतरी मनात आहे तिच्या. ती बोलत नाही काहीच.
हो, तिच्याजवळ बोलावं लागेल. ती येईल का?
हो मॅडम. मी तिला काल समोर बसवून शांतपणे समजावून सांगितले की हे जर असेच सुरू राहिले तर सगळा आनंद हरवून बसशील. आमच्याजवळ बोलता येत नसेल तर आपण दुसऱया कुणाची तरी मदत घेऊ. ती यायला तयार आहे. नंतर ठरल्या वेळेनुसार मालनताई वीणाला घेऊन आल्या. तिच्याशी संवाद साधल्यानंतर बऱयाच गोष्टी उलगडत गेल्या.
वीणाच्या ऑफिसमधे एक महिला होती. ती आवड म्हणून ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करत होती. ऑफिसमधल्या काही लोकांनी तिला उत्सुकतेने आपापल्या पत्रिका दाखवल्या होत्या. काही जणांना तिने सांगितलेले अगदी पटले तर काही जणांच्या बाबतीत त्या गोष्टींचा काहीही संबंध नव्हता. सहकाऱयांच्या आग्रहाने वीणाने आपल्या लेकीची पत्रिका तिला दाखवली. पत्रिकेवर नजर फिरवत बाकी सगळं छान आहे परंतु 25 व्या वर्षी हिला खूप जपायला हवे असं त्या म्हणाल्या. बस्स, त्यानंतर मैत्रिणींमधे गंडांतर वगैरे विषयांची चर्चा सुरू झाली. अनेक उदाहरणे वीणाने ऐकली आणि ते सगळं हिच्या मनामध्ये एवढं बसलं की मनुला पाहिलं की तिला धस्स व्हायचं. खरंच हिला काही झालं तर?
तिचं मन तिला बजावायचं. अगं, वीणा शिकलेली ना तू, काय आणि कसले विचार करतेस? पुन्हा वाटायचं की या क्षेत्रातील कुणी तज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्यावा का? पुन्हा विचार यायचा, नको. परत त्यांनी तेच सांगितले तर? आणखीनच अवघड. नवऱयाचा या कुठच्याच गोष्टींवर किंचितही भरवसा नव्हता त्यामुळे त्याच्याजवळ कसं बोलणार.. म्हणून ती शांत राहिली परंतु महिनाभर आतल्या आत तिचा स्वतःसोबतच झगडा सुरू होता. हळूहळू स्वप्नं पडू लागली. जीव घाबरू लागला. वीणाला चिंता ग्रासू लागली होती. काहीवेळा ती प्रयत्नपूर्वक हे विचार बाजूला सारायची परंतु समोर मानसी दिसली की पुन्हा चक्र सुरू व्हायचे. पंख्याखाली बसली तर पंखा तर पडणार नाही ना, हा विचार तिला त्रस्त करायचा. मैत्रिणींनी सांगितलेले विविध किस्से मनात घर करून राहिले होते आणि ‘गंडांतर’ या एका शब्दाने तिची अलीकडे झोपही उडवली होती.
वीणाला काही गोष्टी वेगळय़ा पद्धतीने समजावून सांगून मनात येणारा विचार हा केवळ विचार आहे याचे भान आणणे आवश्यक होते. समुपदेशन आणि विविध तंत्रांचा सराव याच्या सहाय्याने वीणा या चिंतेतून बाहेर पडलीही. परंतु वीणाला असं काय झालं होतं? तर तिची भवितव्यातील सुरक्षितता नाहीशी झाली होती. वीणा ऑफिसमधून आली आणि मानसी दिसली नाही की तिला वाटायचं, कुठे गेली ही? घराबाहेर पडायची काही गरज आहे का? काही झालं तर? अपघात झाला तर या आणि यासारख्या वेगवेगळय़ा विचारांची काल्पनिक भुतं तिला त्रास देत होती.
खरंतर चिंता हा माणसाच्या आयुष्यातील एक तसा अविभाज्य आणि स्वाभाविक घटक आहे. स्वाभाविक चिंता सावधानतेचा इशारा देते. जबाबदारीची जाणीव करून देते. मात्र वास्तविक चिंता ज्यावेळी विकृत चिंतेकडे वळते त्यावेळी असा गोंधळ होतो. पहा हं.. वरच्या उदाहरणातील वीणाला तिच्या विश्वासानुसार मुलीवर ‘गंडांतर’ येणार म्हटल्यावर काळजी वाटली, स्वाभाविक आहे. परंतु समजा वयाच्या 25 व्या वषी हे गंडांतर येऊ शकेल असे मानले तरी मुलीला जराही नजरेआड न करणे, ती दिसत नाही म्हटल्यावर जीव घाबराघुबरा होणे, अस्वस्थ वाटणे याचे कारण पाहिले तर आईला मुलीची वाटणारी स्वाभाविक चिंता इथे विकृत झाली होती.
भीती आणि चिंतेमध्ये फरक आहे. भीती ही प्रत्यक्ष संकटावरील प्रतिक्रिया असते तर चिंता ही संकटाची अपेक्षा असते असे म्हटल्यास ते वावगे ठरू नये. म्हणजे पहा, उद्या कसे व्हायचे हा विचार आपल्याला काम करायला, नियोजन करण्यासाठी प्रवृत्त करतो. पण त्याचे रूपांतर जर चिंतेत झाले तर मात्र तो इतका त्रासदायक ठरतो की आजचे कामही हातून नीट होत नाही. प्रकृतीवर अनिष्ट परिणाम होतो, अस्वस्थता येते. उद्याविषयक अंदाज बांधणे करायला हवे हे खरे परंतु भविष्याची निरर्थक चिंता करून मनाला पोखरणे हे आपले आपणच थांबवायला हवे. स्वतःच्या मनात डोकावत, विचार, भावना न्याहाळत, अविवेकी प्रतिक्रिया देण्यापेक्षा विवेकी प्रतिसादाकडे आपल्याला कसे जाता येईल यादृष्टीने प्रयत्न केले तर विकृत चिंतेपासून आपण स्वतःला बाजूला ठेवू शकू हे मात्र खरे!
Ad. सुमेधा देसाई, मो.94226 11583








