ऑनलाईन टीम / पुणे :
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये मोठया प्रमाणात गुणवत्ता आहे. विविध क्षेत्रातील अनेक दिग्गज व नामवंत ग्रामीण भागातून पुढे आले आहेत. परंतु त्यांच्यापर्यत पुरेशा सोयी-सुविधा पोहोचत नाहीत, अशा विद्यार्थ्यांना पुण्यातील गणेश मंडळांनी दिलेला मदतीचा हात कौतुकास्पद आहे. समाजातील ज्ञानाच्या मशाली विझविण्याचा प्रयत्न अनेकजण करीत आहेत, परंतु अशा उपक्रमांमधून ज्ञानाच्या मशाली पेटत ठेवायला हव्यात, असे मत ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा. सु. ह. जोशी यांनी व्यक्त केले.
बुधवार पेठेतील साईनाथ मंडळ ट्रस्टसह आपटे घाट आनंद तरुण मंडळ शनिवार पेठ, वीर शिवराज मित्र मंडळ गुरुवार पेठ, सिद्धिविनायक मित्र मंडळ विश्रांतवाडी, विधायक मित्र मंडळ कसबा पेठ, शिवाजी मित्र मंडळ भवानी पेठ आणि बालविकास मित्र मंडळ बुधवार पेठ हे एकत्रितपणे ग्रामीण भागातील कातकरी व शेतक-यांच्या मुलांसाठी 1 हजार पुस्तके व वह्या, पेन पाठवित आहेत. त्याचे पूजन बालविकास मित्र मंडळासमोर झाले.
प्रा.सु.ह.जोशी म्हणाले, दुर्गम भागामध्ये आजही सुविधा नाहीत, तरीही तेथील विद्यार्थी चांगले काम करित आहेत. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम अधिक संख्येने आयोजित केले पाहिजे. विद्यार्थ्यांना मदतीच्या रुपाने प्रोत्साहन दिल्यास ते उद्याचे चांगले नागरिक व उच्च पदावर पोहचू शकतील.









