प्रतिनिधी/ पणजी
गोमंतक बहुजन समाज ही नवीन संस्था तयार केली असून जी गोमंतकीयांसाठी कार्य करेल. गोव्यातील बहुजन समाजाच्या लोकांना एकत्रित आणण्याचे या संस्थेचे मुख्य़ उद्दीष्ट असल्याची अशी माहिती गोमंतक बहुजन समाजाचे संस्थापक रवी हरमलकर यांनी पणजीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी तिसवाडी तालुका अध्यक्ष सूरज नाईक, फोंडा तालुका अध्यक्ष संतोष तारी, सांगे तालुका अध्यक्ष अमर नाईक, केपे तालुका अध्यक्ष गितेश नाईक, सचिव गणेश शिरोडकर, खजिनदार मनोहर गडेकर उपस्थित होते.
बहुजन समाजात विविध समस्या आहेत. आल्वारा, कुमेरी, यासारख्या जमिनीबाबत अनेक समस्या आहेत. बहुजन समाजातील लोकांना जमिनीबाबत ज्या समस्या आहेत त्या सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येणरा आहे. याशिवाय त्यांना जमीन हक्क देण्यासाठी त्यांना एकत्र व्यासपीठ देण्याचे काम करणार आहे. गोवा मुक्तीनंतर भाऊसाहेब बांदोडकर यांनी ‘कसेल त्याची जमीन आणि राहील त्याचे घर’ ही संकल्पना घेऊन गोमंतकीयांना जमीन हक्क देण्याचा प्रयत्न केला होता. परंतु कालांतराने याविषयी कुणीच ठाम भूमिका घेतली नाही. कोमुनिदाद जमिनीवर गोमंतकीय हे फक्त टेनन्ट म्हणूनच आहेत. सर्व गोमंतकीयांनी तिरस्कार न करता एकत्रित येऊन त्यावर उपाय काढणे आवश्यक आहे असे रवी हरमलकर यांनी यावेळी सांगितले.
बहुजन समाजातील जास्तत लोक हे खाणव्यवसायावर अवलंबून आहे. परंतु अजूनपर्यंत खाण अवलंबितांना न्याय मिळाला नाही. खाण अवलंबितांनी एकत्र यावे. काही दिवसांनी बहुजन समाजाचा संपर्क क्रमांक जाहीर केला जाईल. गोमंतकीयांनी आपल्या हक्कासाठी एकत्र यावे असे आवाहन हरमलकर यांनी यावेळी केले.
जमीन हक्काबाबत विविध संस्था, समाजाने त्यांच्या व्यासपीठावर चर्चा केली आहे. आता या प्रकारचे व्यासपीठ बहुजन समाजाच्या लोकांना देण्याचा प्रयत्न करणार आहे. आतापर्यंत सरकार काणकोण येथील कुमेरी जमिनीबाबत, सत्तरीतील मोकाशी जमीन, अल्वारा, आदी समस्या सोडविण्यात अपयशी ठरले आहे असा आरोप रवी हरमलकर यांनी केला.









