प्रतिनिधी / कोल्हापूर
प्रतिकूल परिस्थितीत काम करुन गोकुळला यशाच्या शिखरावर पोहचविण्यात मोलाचा वाटा असणारे कर्मचारी संघाच्या सेवेतुन निवृत्त होत आहेत. याची मनाला खंत वाटत आहे. तथापि संघ नियमानुसार कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर सर्वांनाच सेवानिवृत्त व्हावे लागते. अशा कर्मचाऱयांच्या कष्टाची जाणीव गोकुळ नेहमीच ठेवेल असे प्रतिपादन माजी चेअरमन व जेष्ठ संचालक अरूण नरके यांनी केले.
गोकुळच्या सेवानिवृत्त कर्मचाऱयांच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते. गोकुळ दूध प्रकल्प कार्यस्थळावरील स्व.आनंदराव पाटील-चुयेकर. यांच्या स्मारकाजवळ हा कार्यक्रम झाला. नरके म्हणाले, या कर्मचाऱयांनी गोकुळसाठी सुरुवातीच्या काळात अल्प पगारावर कष्टाचे काम केलेले असून. कर्मचाऱयांच्या सेवेचा जरी समारोप झाला असला तरी त्यांनी पुढील आयुष्यामध्ये जास्तीत जास्त वेळ आपल्या परिवारासाठी द्यावा व प्रामाणिकपणे समाधानी जीवन जगावे असे सांगून या सर्वांना दिर्घायुष्य लाभो अशा शुभेच्छा दिल्या. सेवानिवृत्त कर्मचाऱयांमध्ये 32 जणांचा समावेश आहे. त्यांचा माजी चेअरमन व जेष्ठ संचालक अरूण नरके व उपस्थित संचालकांच्या हस्ते गोकुळच्या वतीने सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी माजी चेअरमन रणजितसिंह पाटील, विश्वास पाटील, अरूण डोंगळे, विश्वास जाधव, संचालक धैर्यशील देसाई, दीपक पाटील, पी. डी. धुंदरे, उदय पाटील, बाळासो खाडे, विजय तथा बाबा देसाई, रामराज कुपेकर-देसाई, जयश्री पाटील-चुयेकर, अनुराधा पाटील, कार्यकारी संचालक डि. व्ही. घाणेकर, बोर्ड सेक्रटरी एस. एम. पाटील, व्यवस्थापक प्रशासन डी. के. पाटील व सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित होते.









