आनंदच्या तारापूर महामार्गावर ट्रक-कारची धडक
वृत्तसंस्था/ आणंद
गुजरातच्या आणंद जिल्हय़ातील तारापूर महामार्गावर बुधवारी पहाटे 6.20 वाजण्याच्या सुमारास एक कार आणि ट्रकची भीषण टक्कर झाली आहे. या दुर्घटनेत चालकासह 10 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 2 मुले आणि 2 महिलांसह एकाच कुटुंबातील 9 जण मृत्युमुखी पडले आहेत. आमनेसामने धडक बसल्याने कारचा चेंदामेंदा झाला होता. कारमध्ये अडकून पडलेले मृतदेह बाहेर काढणे अवघड ठरले होते.
दुर्घटनेनंतर चित्कार ऐकल्यावर परिसरातील लोकांनी तेथे धाव घेत पोलिसांना माहिती दिली आहे. मृतांची ओळख पटवून त्यांच्या कुटुंबीयांना कळविण्यात आले आहे. दुर्घटनेनंतर ट्रकचालक फरार झाला आहे. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले 9 जण भावनगरच्या वरतेज गावाचे रहिवासी होते. हे सर्वजण सूरत येथून स्वतःच्या घरी परतत होते.
दुर्घटनेवर गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी दुःख व्यक्त केले आहे. आणंद जिल्हयात तारापूरमध्ये झालेल्या दुर्घटनेची दुःखद माहिती मिळाली होती. दुर्घटनेत पीडित लोकांना तत्काळ आणि योग्य मदत उपलब्ध करविण्याचे निर्देश दिले आहेत. मृतांच्या आत्म्यांना शांती मिळावी आणि त्यांच्या कुटुंबीयांना दुःख सहन करण्याची शक्ती प्रार्थना करावी अशी देवाकडे प्रार्थना करत असल्याचे रुपाणी यांनी ट्विट करत म्हटले आहे. काँग्रेस नेते आणि राज्यसभा खासदार शक्तिसिंग गोहिल यांनीही दुर्घटनेवर दुःख व्यक्त केले आहे.









