उचगांव / वार्ताहर
तावडे हॉटेल ते चिंचवाड रेल्वे फाटक या गांधीनगर (ता.करवीर ) मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणांवर सार्वजनिक बांधकाम विभागाने कारवाई करत हातोडा मारला. रस्त्याच्या दुतर्फा असणार्या दुकानांचे डिजिटल फलक, कठडे व सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करून बांधली गेलेली अवैध बांधकामे आज पाडण्यात आली. ही कारवाई सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता शिवाजी इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली सायंकाळपर्यंत सुरू राहिली.
गुरुवारी सकाळी साडे अकराच्या दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांचा फौजफाटा आला. मुख्य रस्त्यावरील पानटपऱ्या, चहाची खोकी, गटारीवरील कठडे, डिजिटल फलक, लोखंडी कंपाऊंड हे सर्व जेसीबीच्या साह्याने काढले. काही जणांकडून कारवाईस विरोध झाला. पण सार्वजनिक विभागाने कारवाई सुरूच ठेवली. कारवाईच्या वेळी वाहतूक ठप्प झाली. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश डावलून जी बांधकामे सुरू होती त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली. या कारवाईत सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्रीकांत सुतार, संजय माळी, शिवाजी पाटील, वैभव कुंभार आदि कर्मचारी सहभागी होते. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात होता.
कारवाई दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता शिवाजी इंगवले यांनी सांगितले की सर्वोच्च न्यायालयाचा आदेश डावलून जी बांधकामे सुरू आहेत त्यांच्यावर कारवाई तर होईलच पण प्रसंगी फौजदारी गुन्हेही दाखल करण्यात येणार आहेत. कविता शंकर पंजाबी व इतर तसेच गोपाल दर्यानी, मुकेश अहुजा व इतर यांच्या बांधकामावर कारवाई करण्यात आली आहे. भविष्यात मुख्य रस्त्यावर अतिक्रमित बांधकामावर व न्यायालयाचा आदेश डावलणाऱ्यावर कडक कारवाई केली जाईल.
लॉकडाऊनच्या काळात अनेक जणांनी सर्वोच्च न्यायालयाचा आदेश डावलून अवैध बांधकामे सुरू करून ती पूर्ण केली आहेत. अशा संबंधित बांधकामावर कारवाई कधी होणार, असा सवाल याचीका दाखल करणाऱ्या अंकुश वराळे व अशोक चांदवानी यांनी उपस्थित केला. ऐन सणासुदीच्या तोंडावरच अतिक्रमणावर कारवाई का केली जाते, याचे गौडबंगाल समजून येत नाही. कारवाईमुळे वाहतूकीची कोंडी झाली. ग्राहकांचे व व्यापाऱ्यांचे मोठे हाल झाले, असे व्यापारी प्रतिनिधी विजय जेसवाणी यांनी सांगितले.









