सावंतवाडी / प्रतिनिधी-
सावंतवाडी शहरातील बाजारपेठेतील गर्दी कमी करण्यासाठी उपाय योजना करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे भाजपचे नगरसेवक अॅड. परिमल नाईक यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे केली. शासनाच्या नियमानुसार सध्या आपल्या शहरातील बाजारपेठ व इतर अत्यावश्यक सेवा सकाळी ०७ ते ११ या वेळेत सुरु आहे. बाजारपेठेतील वाढत्या गर्दीचा विचार करता अल्पकालावधीत बाजारपेठ केंद्रीकरण झाल्यामुळे गर्दीवर नियंत्रण राहत नाही. पर्यायाने कोविड विषयक शासकीय नियम व अंमलबजावणीचा सुद्धा फज्जा उडताना प्रकर्षाने दिसत आहे.
परिणामी आरोग्य व इतर यंत्रणेवर सुद्धा अवाजवी ताण येत आहे. बाजारपेठेतील अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी वाड्या – वाड्यावर, वॉर्डनिहाय परवानाधारक भाजी, फळे, मासे विक्रेते यांना स्वच्छतेविषयी अटी व शर्ती घालून परवानगी दिल्यास व बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना त्या मध्ये सामावून घेतल्यास तसेच किराणा व्यापाऱ्यांना विनंती करून होम डिलिव्हरी वर भर दिल्यास बरेच प्रमाणात बाजारपेठचे विकेंद्रीकरण करता येईल.









