ऑनलाईन टीम / मुंबई :
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना ठाकरे सरकारने एक खास भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. ठाकरे सरकारने गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना टोल माफ करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता गणेशोत्सव सुरू होण्याच्या दोन दिवस आधी आणि परतीच्या प्रवासात दोन दिवस टोल मधून प्रवाशांना सवलत मिळणार आहे, अशी माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी दिली.

एकनाथ शिंदे, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सार्वजनिक बांधकाम, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, कोकण विभागातील पोलिस आयुक्त, महापालिका आयुक्तांची व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक घेतली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
शिंदे म्हणाले, टोल सवलतीसाठी कोकणात जाणाऱ्या नागरिकांनी स्थानिक पोलीस स्थानकात वाहन क्रमांक, वाहन मालकाचे नाव आणि प्रवासाची तारीख नमूद केल्यास त्यांना तात्काळ टोल माफी स्टिकर मिळणार आहे. त्यासाठी नागरीकांनी जवळच्या पोलीस स्थानकाशी संपर्क साधावा असेही त्यांनी यावेळी सांगितले.









