आश्वासनांची आतषबाजी करुन शेतकऱयांची फसवणूक, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष वासूदेव काळे यांचा आरोप
प्रतिनिधी/ सातारा
ठाकरे सरकारच्या शेतकरी द्वेषामुळे राज्यातील हजारो शेतकरी कुटुंबांच्या घरात ऐन दिवाळीत अंधार पसरला असून शेतकऱयाची दिवाळी काळी करण्यास ठाकरे सरकारचा नाकर्तेपणा कारणीभूत आहे. वारेमाप आश्वासने व घोषणांचा पाऊस पाडून एकही घोषणा कृतीत न आणणाऱया ठाकरे सरकारने आमच्या प्रश्नांची जाहीर उत्तरे द्यावीत अन्यथा जनतेचीव शेतकऱयाची फसवणूक केल्या प्रकरणी माफी मागावी, अशी मागणी भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे यांनी पत्रकार परिषदेत केली.
साताऱयातील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर, किसान मोर्चा प्रदेश चिटणीस रामकृष्ण वेताळ, जिल्हाध्यक्ष रामदास शिंदे, जिल्हा सरचिटणीस शंकर दडस, जिल्हा चिटणीस कोंडीबा आंबटकर ,सातारा तालुका अध्यक्ष हेमंत शिंदे, महाबळेश्वर तालुका अध्यक्ष जगन्नाथ भिलारे, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, शहराध्यक्ष विकास गोसावी, तालुकाध्यक्ष राजेंद्र इंगळे, महाबळेश्वर तालुका अध्यक्ष मधुकर बिरामणे, सातारा शहर सरचिटणीस प्रवीण शहाणे, सतरा तालुका सरचिटणीस गणेश पालखे, सातारा शहर उपाध्यक्ष चंदन घोडके, तालुका उपाध्यक्ष जिजाबा कारंडे, सिनेकलाकार आघाडी जिल्हाध्यक्ष विकास बनकर, भटके-विमुक्त आघाडी जिल्हा महिला अध्यक्ष प्रियाताई नाईक, युवा मोर्चा शहराध्यक्ष विक्रम बोराटे, ऍड.सचिन तिरोडकर, माजी नगरसेवक किशोर पंडित, जिल्हा पदाधिकारी विजय गाढवे, राजेंद्र चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. ते म्हणाले, राज्यातील 55 लाख हेक्टरहून अधिक शेतजमिनींवरील पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याची सरकारची प्राथमिक आकडेवारी आहे. प्रत्यक्षात 100 लाख हेक्टरहून अधिक जमिनीवरील पीके पूर्ण नष्ट झाली आहेत. पुरामुळे शेतजमीनी नापीक झाल्या आहेत. जमीनींचा कस संपल्यामुळे पुढील दहा वर्षे तरी कोणत्याही पिकाची शाश्वती राहिलेली नाही, ठाकरे सरकार हेक्टरी दहा हजार रुपयांच्या फसव्या मदतीची पाने पुसून शेतकऱयांची थट्टा करत आहे. जाहीर केलेल्या मदतीपैकी फुटकी कवडी देखील शेतकऱयापर्यंत पोहोचलेली नसल्याने राज्यातील शेतकरी नैराश्यग्रस्त झाला असून आत्महत्यांचे प्रमाण वाढत असल्याने ठाकरे सरकार म्हणजे शेतकऱयांचे बळी घेणारे सरकार ठरले आहे. या दुःखामुळे हजारो शेतकरी कुटुंबांची दिवाळी अंधारात जाणार असून, मातोश्री, वर्षा आणि मंत्रालय मात्र रोषणाईने उजळणार आहे. ठाकरे सरकारला जरादेखील लाज असेल, तर यंदाची दिवाळी शेतकऱयाच्या दुःखाची दिवाळी म्हणून जाहीर करून मातोश्री व वर्षावर रोषणाई न करण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावे, असे ते म्हणाले. गेल्या महिनाअखेरीपर्यंत शेतकऱयांनी पीक विम्याच्या 28 लाख पूर्वसूचना दाखल केल्या होत्या. त्यामध्ये आता आणखी काही लाख सूचनांची भर पडली आहे. शेतकऱयास वाऱयावर सोडणार नाही, असे पोकळ आश्वासन देणाऱया मुख्यमंत्र्यांनी विमा कंपन्यांना दिलेल्या 973 कोटींच्या रकमेपैकी शेतकऱयाच्या हातात फुटकी कवडी देखील पडलेली नाही, याची सरकारला शरम वाटत नाही का, असा सवालही त्यांनी केला. लखीमपूरच्या घटनेनंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत शोक व्यक्त करून महाराष्ट्र बंदला पाठिंबा देणाऱया महाविकास आघाडीला राज्यातअतिवृष्टीच्या संकटात सापडलेल्या आणि नैराश्यातून आत्महत्या करणाया शेतकऱयांविषयी द्वेष का? संकटग्रस्त शेतकऱयास सहानुभूती दाखविणारा एक शब्दही मंत्रीमंडळाच्या बैठकीत का काढला जात नाही? असा सवालही त्यांनी केला.









