आप नेते अमित पालेकर यांचा सरकारवर हल्लाबोल : खोटी आश्वासने देऊन अपयश लपवण्याचे भाजपचे प्रयत्न
प्रतिनिधी /पणजी
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासारख्या दिग्गज नेत्याची खोटी आश्वासने प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे अपयश लपवू शकत नाहीत, असे म्हणत आम आदमी पक्षाचे नेते ऍड. अमित पालेकर यांनी खाण अवलंबितांना खोटी आश्वासने दिल्याबद्दल भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे.
नुकतेच गोव्यात आलेल्या श्री. शहा यांनी, विधानसभा निवडणुकीनंतर गोव्यातील खाणी पारदर्शक लिलाव प्रक्रियेसह पुन्हा कार्यान्वित करण्यात येतील, असे अश्वासन दिले होते.
भाजपने राज्यात दहा वर्षे सत्ता उपभोगली. तरीही राज्यातील खाणी सुरू करण्यापासून भाजपला कोणी रोखले होते? असा सवाल शहा यांच्या आश्वासनावर प्रतिक्रिया देताना पालेकर यांनी उपस्थित केला आहे.
भाजप सरकार अकार्यक्षम असून निस्वार्थी हेतूने कोणतेही काम करत नाही, असा दावा पालेकर यांनी केला. खोटी आश्वासने देऊन गोवेकरांना मूर्ख बनवणे बंद करा, असे ते म्हणाले.
दिल्लीतील आप सरकारने काम केले असेल, तर लोकांनी मतदान करावे, असे सांगण्याचे धाडस दाखवले होते. पण भाजपमध्ये ही हिंमत नाही कारण त्यांनी कोणतेही काम केले नाही. त्यामुळे खोटारडेपणा बोलण्यासाठी इतर राज्यातून वरि÷ नेत्यांना गोव्यात बोलवावे लागते, अशी टीका त्यांनी केली.
भाजप सरकारने दिलेल्या खोटय़ा आश्वासनांना गोमंतकीय बळी पडणार नाहीत याची खात्री करा. पक्षाने काही काम केले असेल तरच मतदान करा, अस सांगण्याचे धाडस केवळ ’आप’च करू शकते, अस पालेकर म्हणाले.









