प्रतिनिधी / सातारा :
सहकारी संस्था या सभासद जनतेच्या सर्वांगिण विकासाकरीता स्थापन केल्या जातात. सभासदांचे जीवनमान उंचावणे हे सहकाराचे मुलतत्व किंवा गाभा आहे. सहकार तत्वांना तिलांजली देत, महाराष्ट्रात काही सहकारी संस्था कशा गिळंकृत केल्या गेल्या याविषयी वस्तुस्थिती मांडली. जे प्रकार घडले आहेत त्याची आम्ही फक्त जाहिर वाच्यता केली. या वाच्यतेमध्ये कोणत्याच आमदारांचे किंवा कोणत्या कारखान्याचा नामोल्लेख आम्ही केलेला नव्हता. तथापि खाई त्याला खवखवे या उक्तीप्रमाणे, उदयनराजे कोण असा प्रतिप्रश्न ते करीत असतील तर त्यांच्याच मनात खोट आहे. म्हणूनच त्यांनी गरळ ओकली आहे, असा घणाघात खा. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केला.
उदयनराजे यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात नमुद केले आहे की, आपल्या राज्यात, देशात सहकारी तत्वावर स्थापन झालेल्या संस्था कश्या मोडीत काढल्या गेल्या आहेत हे सर्वांच्या समोर आहे. सहकारी संस्थांतील सभासद मालक सभासद असुनही, स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थापाटी त्यांची कशी कामगार-मजूराप्रमाणे पिळवणुक केली जाते याचीही अनेक उदाहरणे आहेत. अशा सहकारी संस्थांतील भ्रष्टाचार आम्ही बाहेर काढणार, सहकारी संस्थांच्या सभासद जे खरे मालक आहेत, त्यांनी आपल्या मालकी अधिकारांचा वेळीच वापर करुन, अशा स्वाहाकारी आणि स्वार्थी विचारधारेच्या व्यक्तींकडून संस्था खाजगीकरण होण्यापूर्वी सभासदांनी ताब्यात घ्याव्यात असे सर्वसाधारण वक्तव्य केले होते.
आमचे ते वक्तव्य फक्त आणि फक्त यांनाच झोंबले. वास्तविक आमच्या सर्वसाधारण भाष्यावर त्यांनी इतकी आगपाखड करण्याचे कारण नव्हते. ते अगदी व्यक्तीगत बाबींवरही घसरल्याचे पहायला मिळाले. वय वाढले की बुध्दी भ्रष्ट होते अशी अजब संकल्पना मांडली. त्यांनी त्यांच्या पेक्षा सर्वच जेष्ठ असणा-यांच्या बाबतीत त्यांची असलेली वैचारिक दिवाळखोरी याव्दारे दाखवून दिली. कदाचित मानसिक संतुलन तात्पूरते का होईना त्यांचे बिघडले असावे. वाढत्या वयाप्रमाणे प्रगल्भता वाढण्याऐवजी बालीशपणाच वाढला असल्याने दुखः वाटते असे उपरोधक भाष्य उदयनराजेंनी केले आहे.
कदाचित त्यांनी भ्रष्टाचार करुन मोडकळीत काढलेल्या जनतेच्या अनेक सहकारी संस्था आणि जनतेच्या कारखान्यात केलेला भ्रष्ट कारभार यांना शांत बसू देत नसावा. म्हणूनच इतका आगपाखड ते करीत आहेत. तुमच्याबाबतीत काहीच कोण बोलले नाही तर बुडाला आग लागण्याचे कारणच नव्हते. त्यांच्या एकंदरीत वक्तव्यावरुन निश्चितच दाल मे कुछ काला है हे सिध्द झाले आहे. आता यांनी पदाच्या जोरावर दबवून ठेवलेल्या मालक सभासदांनीच, स्वतःला न्याय मिळवण्यासाठी यांचा समाचार घ्यावा, असेही उदयनराजेंनी म्हटले आहे.









