अन्यथा कामकाज चालू दिले जाणार नाही : आमदार विजय सरदेसाई यांचा इशारा
प्रतिनिधी / मडगाव
राज्यात सध्या कोविडने 36 जणांचे बळी घेतलेले असून शनिवारी एकाच दिवशी सहा जणांना प्राण गमवावे लागले. यात एका 14 वषीय मुलीचा समावेश आहे. तरीही विधानसभेत जनतेच्या आरोग्याच्या महत्त्वाच्या प्रश्नावर चर्चा करण्यास सरकार तयार नाही. त्यामुळे आम्ही यासंदर्भात विधानसभेत स्थगन प्रस्ताव मांडणार असून तो चर्चेस न घेतल्यास विधानसभेचे कामकाज चालू दिले जाणार नाही, असे गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष असलेले फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी स्पष्ट केले आहे.
तीन आठवडय़ांचे अधिवेशन कमी करून आज सोमवारी एकदिवशीय अधिवेशन घेण्यात येणार आहे. या अधिवेशनात कोविडवर चर्चा होणार नाही हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आम्ही स्थगन प्रस्ताव मांडणार आहोत. हा प्रस्ताव चर्चेस न घेतल्यास सरकार लोकशाहीची हत्या करत असल्याचे सिद्ध होईल, असे सरदेसाई म्हणाले.
या अधिवेशनात काही दिवसांपूर्वी जे असंबंधित अंदाजपत्रक मांडण्यात आले होते त्यावर चर्चा न करताच मंजुरी घेण्याबरोबर मागण्या व विधेयके यांना विक्रमी प्रमाणात मंजुरी मिळविली जाणार आहे. मात्र जनहिताच्या दृष्टीने कोविड महामारीसंदर्भात सरकारची काय तयारी आहे यावर चर्चा होणार नाही हे कामकाज पत्रिकेवरून स्पष्ट होते, हे सरदेसाई यांनी नजरेस आणून दिले. महामारीचा विषय तसेच मोले भागात जी अडीच लाख झाडांची कत्तल केली जाणार आहे त्यासंदर्भात तसेच राज्याच्या तिजोरीत खडखडाट असल्याने आर्थिक स्थितीवर चर्चा आवश्यक आहे. विरोधकांनी फक्त ऐकून घ्यायचे असे सरकारला वाटते का, असा सवाल सरदेसाई यांनी केला आहे. मात्र तसे होणार नसून आमच्याकडे लोकशाही पद्धतीत एक हत्यार आहे. कामकाज प्रक्रियेच्या नियम 69 च्या अंतर्गत जनतेच्या दृष्टीने महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्याची मागणी उचलून धरता येते व ती मागणी आम्ही स्थगन प्रस्ताव आणून करणार आहोत, असे सरदेसाई यांनी जारी केलेल्या व्हिडीओ संदेशात म्हटले आहे.









