माजी आमदार अमल महाडिक यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोरोना महामारीमुळे राज्यात अनेकवेळा लॉकडाऊन लागू करण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यात लॉकडाऊनमुळे उद्योग, व्यापार, यासह सामान्य नागरीकांचे अर्थकारण कोलमडले आहे. याचा गांभिर्याने विचार करुन सध्या सुरु असलेली सक्तीची वसुली तात्काळ बंद करुन घरफाळा, वीज बिलात सवलत देण्यात यावी, अशी मागणी माजी आमदार अमल महाडिक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
जिह्यातील शेतकरी, व्यापारी, उद्योजक आणि सर्वसामान्य जनता असे घटक अडचणीत आले आहेत. लॉकडाऊन काळात शिरोळच्या शेतकऱयांना त्यांचा मौल्यवान भाजीपाला फेकून द्यावा लागला. व्यापाऱयांचे व्यावहारिक गणित कोलमडले आहे.
अशा प्रकारे जिल्ह्यातील सर्वच घटक अडचणीत सापडले आहेत. तरीही त्यांच्याकडून सक्तीने वीजबिल व घरफाळा सारखे कर वसूल केले जात आहेत. दैनंदीन खर्च भागवणे अवघड होत असताना हा कर कसा भरणार, हा प्रश्न आहे. अशावेळी सरकार म्हणून आपण आम जनतेला दिलासा देण्याची गरज आहे. तरी गरज ओळखून शेतकरी व व्यापारी यासारख्या घटकांना वीजबिल व घरफाळा यामध्ये सूट देऊन दिलासा देण्याची कार्यवाही करावी, असे अमल महाडिक यांनी पत्रात म्हटले आहे.









