प्रतिनिधी / कसबा बीड
कसबा बीड येथील भोगावती नदीवरील पुलाच्या संरक्षक कठड्याला दुचाकी वरील नियंत्रण सुटल्याने जोरदार धडक दिल्याने युवक संजय राजाराम आंबी (वय २३) जागीच ठार झाला.
मिळालेल्या माहितीनुसार संजय हा दुपारी एक वाजण्याच्या सुमारास कामावरून घरी येत होता. महे व कसबा बीड दरम्यानच्या पुलाच्या संरक्षक कठड्याला दुचाकीने जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की संरक्षक कठड्याचा पिलर तुटून दुचाकी सुमारे २० फुट नदी पात्रात पडली. दुचाकी सह तरूण खडकाळ जागेवर जोरात पडल्याने डोक्याला जोरदार मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी लोकांची मोठी गर्दी झाली होती. त्याला सीपीआर येथे दाखल केले पण डॉक्टरांनी त्याना मृत घोषित केले. संजय हा कोल्हापूरात एमआयडीसी मध्ये मोटर रिवायडींगचे काम करत होता. तो एकुलता एक होता. संजयचे वडील ही मोटर रिवायडींगचे काम करत आहेत. संजयच्या निघून जाण्याने कसबा बीड गावामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
सर्वसामान्य कुटुंबातील संजय आंबी याच्या वडिलांनी मोटार रिवायडींगचे काम करत मुलास शिक्षण दिले होते. त्याच्या या अचानक निघून जाण्याने आंबी कुटुंबियांच्या वरती दुःखाचा डोंगर कोसळला आहे आहे.









