ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांचा प्रादुर्भाव वेगाने पसरत आहे. मुंबईमध्ये तर चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका अधिक सतर्क झाली असून त्याचबरोबर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईही करण्यात येत आहे.

काल मुंबईत 823 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे नव्या नियमानुसार बीएमसीने शहरातील तब्बल 1305 इमारती सील केल्या आहेत. दरम्यान, 5 हून अधिक कोरोनाग्रस्त आढळलेल्या इमारती सील करण्याचा नवा नियम पालिकेने लागू केला आहे.
मुंबई महापालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई शहरात 2749 कोरोना रुग्ण आढळल्याने बीएमसीने तब्बल 1305 इमारती सील केल्या आहेत. त्यात एकूण 71,838 घरे आहेत.
दरम्यान, मुंबईत काल 823 रुग्ण आढळून आले असून 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 440 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. ही संख्या मागील काही दिवसांपासून सातत्याने वाढत असल्याने पालिका प्रशासनासह महापौर किशोरी पेडणेकर, आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच नियमाचे पालन करण्याचे आवाहनही त्यांच्याकडून वारंवार केले जात आहे. लॉकडाऊनची वेळ आणून देऊ नका, अशी तंबीही प्रशासनाकडून देण्यात येत आहे.
- अमरावतीमध्ये लॉकडाऊन; तर यवतमाळमध्ये नाईट कर्फ्यू
महाराष्ट्रातील अमरावती शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे या शहरात पुन्हा एकदा लॉकडाऊन जारी करण्यात आले आहे. तर अमरावतीमध्ये नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. अशा प्रकारे कोरोनाचा रुग्णांची संख्या वाढत राहिल्यास, अन्य शहरांमध्ये देखील नाईट कर्फ्यू लावण्याचा विचार चालू असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी दिली आहे.








