प्रतिनिधी / मुंबई
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव विचारात घेता त्याच्या नियंत्रणासाठी मुंबई शहर जिल्ह्यात विशेष नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून त्याचा संपर्क क्रमांक ०२२-२२६६४२३२ असा आहे, अशी माहिती मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी दिली.
त्याचप्रमाणे महानगरपालिका नियंत्रण कक्षाचा संपर्क क्रमांक ०२२-४७०८५०८५ व टोल फ्री क्रमांक १९१६ असा आहे. महानगरपालिकेने अन्न व निवारा संदर्भात१८००२२१२९२ ही हेल्पलाइन सुरू केली आहे, ती सकाळी ९ते रात्री ९ पर्यंत सुरू असेल.
मुंबई शहर जिल्ह्यातील नागरिकांसाठी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याबाबत प्रशासन संपूर्ण प्रयत्न करीत असून महत्त्वाच्या ठिकाणी असलेले भाजीपाला, किराणा मालाचे मार्केट सुरू करण्यात आले आहेत. तेथे गर्दी होऊ नये, याकरितादेखील काळजी घेण्यात येत आहे. त्यासोबतच असंघटित मजूर वर्गासाठी भोजनाची व्यवस्था धारावी, सायन- कोळीवाडा, वडाळा, वरळी, माहीम, शिवडी, भायखळा, मलबार हिल, मुंबादेवी, कुलाबा विभागातील स्थानिक कार्यालयामार्फत करण्यात येत आहे.
कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी मुंबई शहर जिल्ह्यातील नागरिकांनी प्रशासनास संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.
Previous Articleसांगली : कृष्णा नदीपात्रात बुडून दोन मुलांचा मृत्यू
Next Article परदेशवारीवरुन आलेल्या तरुणीची सोशल मिडीयावरुन बदनामी









