प्रतिनिधी/ नवारस्ता
कोयना प्रकल्प आणि पर्यटनाबाबत मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाली असून याबाबतचा आराखडा लवकरच तयार करून मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोयनेचे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन मुख्यमंत्री नामदार उद्धव ठाकरे यांनी दिले असल्याची माहिती जिह्याचे पालकमंत्री तथा सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी कोयनानगर येथे पत्रकार परिषदेत बोलताना दिली. दरम्यान, कोयना प्रकल्पातून वीजनिर्मिती करून पश्चिमेकडे समुद्रात वाया जाणारे पाणी मुंबईकडे पिण्यासाठी वळवले तर काय हरकत आहे? यात कसलेही राजकारण नसून त्याला कोणीही राजकीय वळण देऊ नये, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोपळी येथील कोयना विद्युत गृह टप्पा क्रमांक 4 ची व कोयना धरण प्रकल्पाचे पाणी केली. त्यानंतर ते पुणे येथील एक्सप्रेस हायवे 4 च्या टनेलच्या कामाची पाहणी करण्यासाठी तातडीने रवाना झाले. त्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये मंत्री पाटील बोलत होते. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, आमदार महेश शिंदे यांची उपस्थिती होती.
मंत्री पाटील पुढे म्हणाले, राज्यात आघाडीचे शासन सत्तेत आल्यावर राज्यातील रखडलेल्या प्रकल्पांची पाहणी करून हे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मंत्रिमंडळात निर्णय झाले होते. मात्र राज्यात गेल्या नऊ महिन्यांपासून कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे एकत्रित येता येत नव्हते. त्यामुळे अनेक प्रकल्पांना भेटी देता आल्या नाहीत. मात्र सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने पुन्हा एकदा महा विकास आघाडीच्या माध्यमातून राज्यातील अनेक प्रकल्पांना भेटी देऊन त्यांची माहिती घेऊन राज्यातील आघाडी शासन ते प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, कोयना पर्यटन आणि कोयनेचे प्रलंबित प्रश्नाबाबत या दौऱयात मुख्यमंत्र्यांची सकारात्मक चर्चा झाली असून कोयनेचे प्रश्न लवकरात लवकर सोडवू, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. अधिवेशन संपल्यानंतर लवकरच बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेतला जाईल. कोयना जलविद्युत प्रकल्पाचे यंत्रसामुग्री जुनी आहे. त्यात आमूलाग्र बदल करून सध्याची सुमारे दोन हजार मेगावॅट वीज निर्मितीची क्षमता पुढे अधिक वाढवता येईल का?याबाबत मुख्यमंत्र्यांनी प्रकल्पाच्या अधिकाऱयांशी सखोल चर्चा केली. तसेच प्रकल्पाच्या रखडलेल्या प्रश्नाबाबत मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱयांना योग्य त्या सूचना केल्या. काही प्रकल्प निधीअभावी बंद असल्याने त्यांना निधी उपलब्ध करून देण्याबाबतही चर्चा झाली. दरम्यान अधिवेशन संपल्यानंतर अनेक वर्षे रखडलेल्या कोयनेतील प्रकल्पांना गती मिळेल, असा विश्वासही मंत्री देसाई यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना व्यक्त केला.








