प्रतिनिधी/ रत्नागिरी
कोकण रेल्वेच्या सुमारे 700 कि.मी. अंतराच्या विद्युतीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. या कामासाठी सुमारे रुपये 1100 कोटी इतका खर्च अपेक्षित असून हे काम दोन टप्प्यांमध्ये केले जात आहे. संपूर्ण कोकण रेल्वेमार्गाची तोकुर ते वेरना (टप्पा 1) व वेरना ते रोहा (टप्पा 2) अशी विभागणी करण्यात आलेली आहे. टप्पा-1 मधील तोकुर ते उडुपी या सुमारे 200 कि.मी.च्या मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. रोहा ते रत्नागिरीदरम्यान विद्युतीकरणाचे काम 90 टक्क्यांपर्यंत झाले आहे.
रेल्वे मंत्रालयाने हाती घेतलेल्या मिशन इलेक्ट्रिफिकेशन या मोहिमेंतर्गत भारतीय रेल्वेच्या सुमारे 2 लक्ष कि.मी. ब्रॉडगेज रेल्वे जाळ्याचे 2023 पर्यंत 100 टक्के विद्युतीकरण केले जाण्याचे प्रस्तावित आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी सांगितल्यानुसार, सध्या देशातील एकूण वीज वापरापैकी 1.37 टक्के अर्थात 20.44 कोटी युनीट्स इतका वीज वापर भारतीय रेल्वेद्वारे केला जातो. त्याचप्रमाणे देशात एकूण आयात केल्या जाणाऱया एच.एस.डी. या शीघ्रगती डिझेलपैकी 3 टक्के अर्थात 3.1 बिलियन लिटर्स इतके डिझेल हे भारतीय रेल्वेसाठी वापरण्यात येते. डिझेलच्या या अतिवापरामुळे देशातील कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण प्रचंड वाढलेले असल्याने देशात प्रदुषणाची समस्या बळावली आहे. यासाठी रेल्वे प्रशासनाने मिशन इलेक्ट्रिफिकेशन ही मोहीम हाती घेतली. मोहिमेचा खर्च सुमारे रु.78,000/- कोटी इतका असणार आहे. या मोहिमेमुळे इंधनाचा वापर तर कमी होईलच, शिवाय रेल्वेगाडय़ांची संख्या वाढवता येईल. गाडय़ांचा वेग वाढवता येईल आणि नव्या गाडय़ासुद्धा सुरु करता येतील.
डिझेल तुलनेत विजेच्या इंजिनाचे वेग वाढवणे व वेग कमी करणे, या प्रक्रिया अधिक जलदगतीने होत असल्याने गाडीचा वेग वाढून प्रवासाचा वेळ कमी होतो. कोकण रेल्वेचे विद्युतीकरण पूर्ण झाले की, दिल्ली व पूर्वेकडच्या राज्यांकडून थेट कन्याकुमारीपर्यंत जाणाऱया रेल्वेगाडय़ा विजेवर चालवणे रेल्वे प्रशासनास शक्य होईल. ज्यामुळे प्रदूषणाचा त्रास कमी होईलच. शिवाय इंधनाचा बेसुमार वापर कमी होईल. मालाच्या व प्रवाशांच्या वाढीव वाहतुकीमुळे रेल्वेच्या महसुलात प्रचंड वाढ अपेक्षित आहे. सध्या कोकण रेल्वेचा मार्ग एकेरी असल्याने पासिंगसाठी गाडय़ांना थांबवावे लागते. विशिष्ट भौगोलिक परिस्थितीमुळे कोकण रेल्वेचे पूर्ण दुहेरीकरण हे कठीण तर आहेच. शिवाय खर्चीकही आहे. यावर उपाय म्हणून रेल्वे दर दहा ते बारा कि.मी. च्या अंतरावर एक क्रॉसिंग स्टेशन तयार करीत आहे. कळंबणी, कडवई, पोमेंडी, खारेपाटण, अचिर्णे सापे -वामने ही नवीन स्टेशने पूर्ण झाली की क्रॉसिंगची ठिकाणे वाढून गाडय़ांना जास्त वेळ थांबवावे लागणार नाही. सापे वामने स्टेशन महाड पासून जेमतेम 5 कि मि अंतरावर आहे .शिवाय ज्या गावांना आजवर रेल्वेचा लाभ मिळाला की ती गावे विकासाच्या मार्गावर येतील









