प्रतिनिधी/ कराड
केंद्र सरकारकडून महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला दुजाभावाची वागणूक मिळत आहे. महाराष्ट्रातील विकासकामांना अडथळा आणण्याचे काम केंद्राकडून होत आहे. मात्र अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये स्थापन झालेले महाविकास आघाडीचे सरकार भक्कम असून, अतिशय चांगल्या पद्धतीने एकदिलाने लोकांच्या सेवेसाठी काम करत आहे, असा विश्वास कृषी व सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी व्यक्त केला.
कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी मनोहर शिंदे, शिवराज मोरे उपस्थित होते.
मंत्री विश्वजीत कदम म्हणाले, केंद्राने महाराष्ट्रात सरकार कोणाचे आहे, हे न पाहता येथील जनतेसाठी मदतीचा हात पुढे करावा. परंतु तसे होताना दिसत नाही. केंद्राकडून महाराष्ट्राचे येणे असलेली जीएसटीची अठरा हजार कोटीची बाकी देण्यात केंद्राकडून टाळाटाळ होत आहे, असा आरोपही त्यांनी केला.
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर या सरकारने शेतकयांना एकोणीस हजार कोटींची कर्जमाफी दिली. हे सरकार शब्दाला पक्के असून दिलेला शब्द पाळणारे आहे. कोरोनाच्या संकटामुळे सरकारचे उत्पन्न घटल्याने महाराष्ट्रातील जनतेच्या आरोग्याच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन सरकार काम करत आहे. तसेच अतिवृष्टीच्या कालावधीत नुकसान झालेल्या शेतकऱयांना मदत देण्यासाठी शासनाने दहा हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले. महाविकास आघाडीचे सरकार सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी बांधील आहे. विरोधक मात्र नेहमी टीकाटिप्पणी करत असतात. परंतु त्यांनी त्यांच्या कालावधीत काय केले हे जनतेसमोर येऊन सांगावे. त्यांनी त्यांचे सरकार असताना शेतकऱयांसह सर्वसामान्य जनतेला त्रास देण्याचे काम केले. विरोधकांकडून महाविकास आघाडीचे सरकार पडेल असे वारंवार सांगितले जात असले, तरी त्यामध्ये काही खरे नाही. महाविकास आघाडी सरकार भक्कम असून पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वासही मंत्री कदम यांनी व्यक्त केला.
ईडीच्या कारवाईबाबत बोलताना ते म्हणाले, नेमकं काय घडले हे मला माहीत नाही. त्यामुळे त्याबाबत भाष्य करणे योग्य नाही, असे सांगून त्यांनी याबाबत अधिक बोलण्याचे टाळले. वीज बिलाबाबत बोलताना मंत्री कदम म्हणाले, कोरोनाच्या संकटामुळे अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या संकटातून बाहेर पडल्यानंतर हळूहळू त्याबाबतची मदत केली जाईल. कराड कृष्णा पुलाची दयनीय अवस्था व पुणे-बंगळूर आशियाई महामार्गावर पडलेल्या खड्डय़ांबाबत बोलताना ते म्हणाले, याबाबत आम्ही पश्चिम महाराष्ट्रातील सर्व लोकप्रतिनिधी एकत्र येऊन प्रयत्न करणार आहे. राज्य सरकार या प्रश्नांमध्ये लक्ष घालून लोकांच्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करेल. सहकारी संस्थांच्या निवडणुका मार्चच्या अगोदर घेतल्या जातील, असेही त्यांनी सांगितले
महाविकास आघाडीचे शिक्षक, पदवीधर निवडणुकीत वर्चस्व
मंत्री कदम म्हणाले, महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी या निवडणुकीमध्ये ताकदीने सहभाग घेतला आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने निवडणूक प्रचारात नियोजनबद्ध आघाडी घेतली आहे. पुणे पदवीधरमधून महाविकास आघाडीचे अरुण लाड व शिक्षकमधून जयंत आसगावकर मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास व्यक्त करत संपूर्ण राज्यात महाविकास आघाडीला पोषक वातावरण आहे, असा दावाही कदम यांनी केला.









